Manisha Koirala : "माझा नवरा दुश्मन..." घटस्फोटाच्या बऱ्याच वर्षांनंतर मनिषा कोराईलाने केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2023 03:43 PM2023-04-02T15:43:55+5:302023-04-02T16:02:36+5:30

लग्न, घटस्फोट आणि कॅन्सरशी झुंज असं बरंच काही मनिषाच्या आयुष्यात घडलं.

९० च्या दशकातील आघाडीची अभिनेत्री मनिषा कोईरालाने (Manisha Koirala) मोठ्या काळानंतर कमबॅक केले आहे. मनिषाने अनेक हिट सिनेमे दिले. हिंदी, तमिळ, तेलुगू अशा अनेक भाषांमध्ये तिने काम केले.

1991 मध्ये आलेल्या 'सौदागर' सिनेमातून तिने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. पहिल्याच चित्रपटातून ती अनेकांच्या नजरेस पडली आणि तिला सिनेमांच्या एकामागोमाग एक ऑफर्स येणं सुरु झालं. बॉम्बे, इंडियन, दिल से, मन, 1942 अ लव्ह स्टोरी अशा अनेक सुपरहिट चित्रपटात मनिषाने काम केले आहे.

बॉलिवूडच्या या प्रचंड यश मिळालेल्या अभिनेत्रीचं खरं आयुष्य मात्र एकाकीच राहिलं. लग्नानंतर तिने बरंच काही सहन केलं आणि नंतर घटस्फोट घेतला. कॅन्सरसारख्या गंभीर आजाराशीही तिने यशस्वी झुंज दिली. लग्नानंतर झालेला त्रास तिने नुकताच एका मुलाखतीत सांगितला आहे.

मनिषाचा जन्म नेपाळमध्ये झाला. नेपाळचेच उद्योगपती सम्राट दहलसोबत मनिषाने 2010 मध्ये लग्नगाठ बांधली. मात्र लग्नानंतर २ वर्षातच 2012 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. आता बऱ्याच वर्षांनंतर मनिषाने घटस्फोटाबाबत अनेक खुलासे केले आहेत.

सम्राट आणि मनिषाची ओळख सोशल मीडियावर झाली होती. दोघंही अनेकदा एकमेकांना भेटायचे आणि एक दिवस त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. मात्र लग्नाला ६ महिने झाल्यानंतर त्यांच्यात मतभेद होण्यास सुरुवात झाली. अनेक प्रयत्नांनंतरही गोष्टी सुरळीत झाल्या नाहीत.

मनिषा म्हणाली, 'लग्नाबाबतीत मी खूप स्वप्न बघितले होते. मात्र ते कधीच पूर्ण होऊ शकले नाहीत. पण मी यासाठी कोणालाच दोषी ठरवणार नाही. जर तुम्ही लग्नात आनंदी नसाल तर वेगळं होणं हाच उत्तम पर्याय आहे. लग्नानंतर केवळ ६ महिन्यातच माझा नवरा माझा दुश्मन बनला होता. एक पत्नी आणि महिलेसाठी याहून वाईट ते काय असेल.'

2012 मध्ये मनिषाला गर्भाशयाच्या कॅन्सरचे निदान झाले. यानंतर ती उपचारासाठी बराच काळ परदेशात होती. तेव्हा फार हिंमतीने तिने कॅन्सरशी झुंज दिली आणि त्यावर मात केली. पुन्हा कॅन्सर होण्याची तिला भिती आहे मात्र ती म्हणते सकारात्मक राहूनच कॅन्सरवर मात करता येऊ शकते.

मनिषा आता पुन्हा अभिनय क्षेत्रात परतली आहे आणि नशीब आजमावत आहे. संजय दत्तची बायोपिक 'संजू' सिनेमात तिची छोटी भूमिका होती तर नुकत्याच रिलीज झालेल्या कार्तिक आर्यनच्या 'शहजादा' सिनेमातही तिने काम केले. तर आता ती संजय लीला भन्साळीच्या 'हीरामंडी' सिनेमात दिसणार आहे.