'जुळून येतील रेशीमगाठी'चा दुसरा भाग नको..., सुपरहिट मालिकेबद्दल असं का म्हणाला ललित प्रभाकर?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2026 16:03 IST2026-04-13T16:02:53+5:302026-04-13T16:03:52+5:30
आदित्य देसाईच्या भूमिकेमुळे घरोघरी ओळख मिळाली, त्याच मालिकेबद्दल ललित प्रभाकर म्हणाला...

'जुळून येतील रेशीमगाठी'चा दुसरा भाग नको..., सुपरहिट मालिकेबद्दल असं का म्हणाला ललित प्रभाकर?
ललित प्रभाकर हा मराठीतील हँडसम, चार्मिंग अभिनेता सध्या बॅक टू बॅक सिनेमांमध्ये दिसत आहे. मराठीच नाही तर हिंदीतही तो भूमिका साकारत आहे. ललितला आजही आदित्य देसाई याच नावाने ओळखलं जातं इतकी त्याची भूमिका लोकप्रिय झाली. २०१३ साली आलेल्या 'जुळून येती रेशीमगाठी' मालिकेने त्याला यशाच्या शिखरावर पोहोचवलं. आदित्य-मेघना ही जोडी तर आजही सोशल मीडियावर सर्वांची आवडती जोडी आहे. दरम्यान या मालिकेचा दुसरा भाग यावा का? यावर ललित प्रभाकरने काय उत्तर दिलं वाचा.
'लोकशाही'ला दिलेल्या मुलाखतीत ललित प्रभाकर म्हणाला, "मालिकेचा दुसरा भाग यावा असं मला वाटत नाही. कारण ती जादू तेव्हाच तयार झाली. त्या त्या वेळची ती ती एनर्जी असते. त्याला पुढे आता कोणी हात लावायला नको असं मला वाटतं. ती जपून राहिली पाहिजे. छान मालिका तयार झाली, तो काळही तसा होता, दिग्दर्शक आणि लेखक तसे होते त्यामुळे मालिका तशी जुळून आली होती. ते तेव्हाच होऊ शकलं होतं."
तो पुढे म्हणाला, "त्यावेळच्या मालिकांमध्ये खूप फरक होता. आमच्या मालिकेत कोणी व्हिलन नव्हतं. नकारात्मक भूमिका नव्हती. परिस्थिती थोडी निगेटिव्ह असायची. एकत्र कुटुंबाची गोष्ट असलेली ती मालिका होती. त्यातला खरेपणा टिकून होता. तीच त्या मालिकेची खासियत होती. अर्थात त्याचं लिखाण, दिग्दर्शन आणि त्यातील सगळे कलाकार यांनी ते कॅरेक्टर्स जिवंत केले. मला आजही लोक आदित्य नावाने हाक मारतात. माझ्या आयुष्यात ती मालिका खूप महत्वाची ठरली. अजूनही लोक ती मालिका इंटरनेटवर बघतात, मला रोज किमान तीन-चार मेसेज येतात. त्यावर खरंच काय प्रतिक्रिया द्यावी मला कळत नाही."