२० वर्षांनी मोठ्या रणवीरसोबत ऑनस्क्रिन रोमान्स; वयातील अंतरामुळे होणाऱ्या ट्रोलिंगवर साराचं सडेतोड उत्तर, म्हणाली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2026 11:32 IST2026-01-21T11:26:50+5:302026-01-21T11:32:11+5:30
20 वर्षांनी मोठ्या रणवीरसोबत ऑनस्क्रिन रोमान्स; ट्रोल होताच सारा अर्जुन म्हणाली..

२० वर्षांनी मोठ्या रणवीरसोबत ऑनस्क्रिन रोमान्स; वयातील अंतरामुळे होणाऱ्या ट्रोलिंगवर साराचं सडेतोड उत्तर, म्हणाली...
Sara Arjun : आदित्य धर दिग्दर्शित'धुरंधर'(Dhurandhar) हा चित्रपट ५ डिसेंबरला सर्वत्र प्रदर्शित करण्यात आला. या चित्रपटाने आतापर्यंत बॉक्स ऑफिसवर अनेक गाजलेल्या चित्रपटांचे रेकॉर्ड्स मोडले आहेत. धुरंधर रिलीज होऊन महिनाभराचा कालावधी उलटला असला तरीही या चित्रपटाची क्रेझ काही कमी झालेली नाही. अजूनही या स्पाय अॅक्शन चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे. जेव्हा या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला, त्यानंतर अभिनेता रणवीर सिंग आणि अभिनेत्री सारा अर्जुन यांच्यातील वयाच्या अंतराबद्दल सोशल मीडियावर बरीच चर्चा रंगली होती. आता या मुद्द्यावर अभिनेत्री सारा अर्जुन पहिल्यांदाच बोलली आहे.
'धुरंधर' मध्ये रणवीर सिंह आणि सारा अर्जुन यांची मुख्य भूमिका आहे. सारा अर्जुनने 'धुरंधर' चित्रपटात पाकिस्तानी राजकारणी जमील जमाली यांची मुलगी यालिना जमालीची भूमिका साकारली होती. ४० वर्षांच्या रणवीरसोबत २० वर्षाच्या साराला ऑनस्क्रिन रोमान्स करताना पाहून अनेकांना त्यांच्या वयाबद्दल प्रश्न पडले. आता चित्रपटाच्या यशानंतर खुद्द सारा अर्जुनने या चर्चांवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. एनडीटीव्ही सोबत संवाद साधताना साराने सांगितलं, चित्रपट रिलीज झाला त्यावेळी ती सोशल मीडियावर फारशी सक्रिय नव्हती. त्यामुळे या सगळ्या गोष्टी तिच्यापर्यंत पोहोचल्याच नाहीत. यावर बोलताना सारा म्हणाली, "या सगळ्या चर्चा फक्त सोशल मीडियावरच आहेत. मी सोशल मीडियावर सक्रिय नाही, त्यामुळे या गोष्टींकडे मी फारसं लक्ष देत नाही."
यापुढे अभिनेत्री म्हणाली, "शिवाय मला असंही वाटतं की, प्रत्येकाचं एक आपलं मत असतं. मी जगा आणि जगूद्या यावर विश्वास ठेवणारी मुलगी आहे. हे त्यांचं मत आहे. त्याचा माझ्यावर काहीही परिणाम होत नाही. मला चित्रपटाची कथा माहीत होती आणि आमच्यातील वयाबद्दलही कल्पना होती."
या मुलाखतीत रणवीर कौतुक करत सारा म्हणाली," भविष्यात मी कोणासोबत काम केलं तरी मला नाही वाटत की, कोणी रणवीरला टक्कर देईल. त्यांनी स्वत ची एक विशिष्ट ओळख निर्माण केली आहे. ते असे एक अभिनेते आहेत, जे आपल्या भूमिकेशी एकरूप होऊन जातात. शिवाय सेटवर प्रत्येकाशी त्याच आदराने वागतात. कोण काय करतंय, सेटवर काय घडतंय? प्रत्येक गोष्टीची त्यांना माहिती असते."