बांद्रा आता सुरक्षित नाही! सैफ अली खानसोबतच्या घटनेनंतर रवीना टंडनने गुन्ह्यांचा पाढाच वाचला
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2025 17:38 IST2025-01-16T17:38:16+5:302025-01-16T17:38:38+5:30
रवीना सोबतही काही महिन्यांपूर्वी एक घटना घडली होती.

बांद्रा आता सुरक्षित नाही! सैफ अली खानसोबतच्या घटनेनंतर रवीना टंडनने गुन्ह्यांचा पाढाच वाचला
अभिनेता सैफ अली खानवर (Saif Ali Khan) रात्री ३ वाजेच्या सुमारास चाकूहल्ला झाला. त्याच्या घरात घुसणाऱ्या अज्ञातानेच सैफवर ६ वेळा वार केले. चोरीच्या उद्देशाने तो आल्याचं प्राथमिक तपासात बोललं जात आहे. सैफला तातडीने रुग्णालयात दाखल केलं असून पहाटेच त्याच्यावर यशस्वी सर्जरी झाली. आता तो धोक्याबाहेर आहे. दरम्यान बांद्रा परिसरात घडणाऱ्या या घटनांमुळे सेलिब्रिटीही हादरले आहेत. प्रत्येक जण प्रतिक्रिया देत आहे. रवीना टंडनने (Raveena Tandon) ट्वीटकरत तिची संताप व्यक्त केला आहे.
रवीना टंडनने ट्वीट करत लिहिले, "बांद्रा सुरक्षित रहिवासी परिसर होता. पण आता फोन, चेन स्नॅचिंग, फेरीवाले, अपघात, जमिनीवर अतिक्रमण, गुन्हे अशा गोष्टी बांद्रात घडत आहेत. सेलिब्रिटींना यामध्ये सहज लक्ष्य केलं जात आहे. यासंदर्भात कडक कारवाई होणं गरजेचंच आहे. सैफ अली खानच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी हीच प्रार्थना."
रवीना टंडनसोबतही काही दिवसांपूर्वी घटना घडली होती. रस्त्यावरील काही लोक तिच्या कारची धडक बसली म्हणून भांडायला आले होते. मात्र सीसीटीव्हीतून वेगळंच चित्र समोरुन आलं होतं. तेव्हाही रविनाने संताप व्यक्त केला होता.
आता कशी आहे सैफची तब्येत?
सैफवर पहाटेच सर्जरी झाली. त्याच्या शरिरातून अडीच इंचाचा चाकूचा तुकडा काढण्यात आला. त्याच्या मानेलाही दुखापत झाली आहे. सध्या तो लीलावती रुग्णालयात आयसीयूमध्ये उपचार घेत आहे.