'धुरंधर'ची स्क्रीप्ट ऐकून काय होती रणवीर सिंगची प्रतिक्रिया; आदित्य धरला विचारला होता एकच 'तो' प्रश्न
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2026 15:31 IST2026-03-24T15:29:31+5:302026-03-24T15:31:22+5:30
तुम्हाला माहितीये का 'धुरंधर'ची कथा ऐकल्यानंतर रणवीरची प्रतिक्रिया काय होती. याबद्दल खुद्द रणवीरनंच खुलासा केला आहे.

'धुरंधर'ची स्क्रीप्ट ऐकून काय होती रणवीर सिंगची प्रतिक्रिया; आदित्य धरला विचारला होता एकच 'तो' प्रश्न
बॉलिवूडचा 'एनर्जी किंग' रणवीर सिंग आणि दिग्दर्शक आदित्य धरचा बहुचर्चित चित्रपट 'धुरंधर २ : द रिव्हेंज' सध्या बॉक्स ऑफिस गाजवत आहे. गुरुवारी १९ फेब्रुवारीला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला. पहिल्याच दिवशी १०० कोटी कमाई करत या सिनेमाने रेकॉर्ड केला आहे. २०२६ मधील सर्वाधिक ओपनिंग करणारा हा सिनेमा ठरला आहे. सध्या प्रत्येकाच्या तोंडी या चित्रपटाचं नाव आहे. प्रेक्षकांसह अनेक कलाकार मंडळी देखील या चित्रपटाचं भरभरून कौतुक करत आहेत. मात्र, तुम्हाला माहितीये का या चित्रपटाची कथा ऐकल्यानंतर रणवीरची प्रतिक्रिया काय होती. याबद्दल खुद्द रणवीरनंच खुलासा केला आहे.
रणवीर सिंगने एका कार्यक्रमात सांगितले की, जेव्हा आदित्य धरनं त्याला या चित्रपटाची कथा ऐकवली, तेव्हा तो पूर्णपणे थक्क झाला होता. "कथा ऐकल्यानंतर मी आदित्यला विचारलं की, 'खरंच असं घडतं का?' त्यावर आदित्यनं 'हो' असं उत्तर दिलं होतं. रणवीरने पुढे सांगितलं, "ही एक दुर्मिळ दर्जाची फिल्म आहे. कोणताही दिखावा न करता प्रत्येक गोष्ट अत्यंत विश्वासार्ह पद्धतीने सादर केली आहे. अशी फिल्म, जी एकाच वेळी गंभीर आणि मनोरंजक असते, ती बनवणं खूप अवघड असतं. या चित्रपटाचा भाग असल्याचा मला अभिमान आहे".
किती कोटींचा गल्ला कमावला?
'धुरंधर'प्रमाणे 'धुरंधर: द रिव्हेंज'नेही प्रेक्षकांना भुरळ घातली आहे. केवळ भारतीय बॉक्स ऑफिसवर नाही तर, जागतिक बॉक्स ऑफिसवर आपला डंका गाजवला आहे. या चित्रपटाला प्रदर्शित होऊन ५ दिवस झाले. 'सॅकनिल्क'नुसार चित्रपटाची जगभरातील पाच दिवसांची एकूण कमाई अंदाजे ८५६.०० कोटींवर पोहोचली आहे. हा चित्रपट आता १,००० कोटींच्या दिशेने वेगाने कूच करत असून, येत्या काही दिवसांत हा टप्पाही पार होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.