राजपाल यादवला अखेर जामीन मंजूर, पण..., चेक बाउन्सप्रकरणी तिहार तुरुंगात होता अभिनेता
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2026 16:46 IST2026-02-16T16:44:30+5:302026-02-16T16:46:13+5:30
राजपाल यादवने भरले दीड कोटी, आता परत सुनावणी कधी?

राजपाल यादवला अखेर जामीन मंजूर, पण..., चेक बाउन्सप्रकरणी तिहार तुरुंगात होता अभिनेता
बॉलिवूड अभिनेता राजपाल यादवच्या जामीन याचिकेवर दिल्ली हायकोर्टात आज सुनावणी झाली. त्यात १ वाजताच्या सुनावणीत न्या. स्वर्णकांता शर्मा यांनी अभिनेत्याच्या वकिलाला २ तासांची मुदत दिली होती. तुमच्याकडे ३ वाजेपर्यंत वेळ आहे. जर पुढील २ तासांत दीड कोटी रुपयांचा डिमांड ड्राफ्ट जमा केला तर आजच जामीन होईल अन्यथा यावर मंगळवारी सुनावणी घेतली जाईल असं कोर्टाने राजपाल यादवच्या वकिलांना सांगितलं होतं. दरम्यान राजपालने याचिकाकर्त्याच्या खात्यात दीड कोटी जमा केले असून कोर्टाने त्याला काही अटींसह अंतरिम जामीन मंजूर केला आहे.
राजपाल यादवचा मॅनेजर गोल्डी यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, "हो, राजपलला जामीन मिळाला आहे. या बातमीने आम्ही सर्वच आनंदी झालो आहोत. राजपाल एक-दोन दिवसात पत्रकार परिषण घेऊन या प्रकरणावर भाष्य करणार आहे. तोवर आम्ही काहीही सांगू शकत नाही. इंडस्ट्रीतील काही कलाकार राजपालच्या मदतीसाठी आले त्यांचे आभार." तर राजपालचा भाऊ श्रीपाल यादव म्हणाले, "आमच्यासाठी ही खूप मोठी दिलासादायक बातमी आहे. आता आमच्या जीवात जीव आला आहे." दरम्यान १ लाखाच्या वैयक्तिक जातमुचकलक्यावर त्याला जामीन मिळाला आहे. या प्रकरणी पुढील सुनावणी १८ मार्च रोजी होणार आहे.
Delhi High Court grants an interim suspension of sentence to actor Rajpal Yadav in the cheque bounce case.
— ANI (@ANI) February 16, 2026
The Court noted that Rs 1.5 crore has been deposited in the respondent’s bank account while considering the relief. It ordered the suspension of the sentence on the…
काय आहे प्रकरण?
९ कोटींचे कर्ज आणि चेक बाऊंन्स प्रकरणी अभिनेता राजपाल यादव तिहार तुरुंगात होता. ५ फेब्रुवारी रोजी त्याने आत्मसमर्पण केले होते. १२ फेब्रुवारीला हायकोर्टाने त्याचा जामीन फेटाळला होता. तर आज त्याला जामीन मंजूर झाला. २०१० साली आलेल्या 'अता पता लापता' सिनेमाचं राजपालने दिग्दर्शन केलं होतं. २०१२ साली सिनेमा रिलीज झाला आणि जोरदार आपटला. ११ कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या सिनेमाने ४७ लाखच कमावले. यासाठी राजपालने ५ कोटींचं कर्ज घेतलं होतं जे नंतर व्याजासकट ९ कोटींपर्यंत पोहोचलं. मुरली प्रोजेक्ट कंपनीने राजपालविरोधात कायदेशीर कारवाई केली. कारण राजपालचे चेक सतत बाउन्स होत होते. अनेक सेशन्स कोर्टांमध्ये सुनावणी झाली. राजपालला दोन वेळा तुरुंगाची चक्करही करुन यावील लागली. मात्र शेवटपर्यंत राजपालला कर्ज फेडता न आल्या ने त्याला शिक्षा सुनावण्यात आली होती.