पहलगाम हल्ल्याच्या दोन दिवसांनंतर माहिरा खाननं आसवं गाळली, पोस्ट शेअर करत म्हणाली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2025 11:06 IST2025-04-25T11:03:42+5:302025-04-25T11:06:32+5:30
पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या २ दिवसांनंतर माहिरा खानने प्रतिक्रिया दिली आहे.

पहलगाम हल्ल्याच्या दोन दिवसांनंतर माहिरा खाननं आसवं गाळली, पोस्ट शेअर करत म्हणाली...
Mahira Khan Reaction On Pahalgam Terror Attack: जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये (Pahalgam Attack) दहशतवाद्यांनी निष्पाप पर्यटकांची हत्या केली. या घटनेनंतर संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे. या दहशतवादी हल्ल्याचा सर्वजण निषेध करत आहेत. बॉलिवूड सेलिब्रिटी कठोर कारवाईची मागणी करत आहेत. बॉलिवूड सेलिब्रिटीसह पाकिस्तानी कलाकार (Pakistani Celebrity) फवाद खान, हानिया आमिर, मावरा होकेने, उसामा खान यांनी पोस्ट शेअर करत दु:ख व्यक्त केलं होतं. पण, किंग खान शाहरुखच्या 'रईस' चित्रपटात झळकलेली पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खान हिने कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती. यामुळं तिला नेटकऱ्यांनी ट्रोलही केलं. आता पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या २ दिवसांनंतर माहिरा खानने प्रतिक्रिया दिली आहे.
माहिराने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली. ज्यामध्ये तिनं लिहिलं, "हिंसाचार, जगात कुठेही असो, कोणत्याही स्वरूपात असो, ते एक भ्याड कृत्य आहे. पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या लोकांप्रती मी संवेदना व्यक्त करते", या शब्दात तिनं भावना व्यक्त केल्या. माहिराने शाहरुख खानच्या 'रईस' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. माहिरा तिच्या पहिल्या चित्रपटानंतर भारतासह जगभरात लोकप्रिय झाली होती. मात्र, त्यानंतर ती कोणत्याही बॉलिवूड चित्रपटात दिसली नाही. पण, भारतात तिचा चाहतावर्ग मोठा आहे. त्यामुळे पहलगाम हल्ल्यावर तिनं उशीरा प्रतिक्रिया दिल्यानं तिचे भारतीय चाहते नाराज झाले.
सरकारची पाकिस्तानवर मोठी कायदेशीर कारवाई
पहलगाम हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानविरोधात आक्रमक पवित्रा घेतलाय. पाकिस्तानसोबतचा सिंधु जल करार स्थगित (Indus Water Treaty Suspended) करण्याचा निर्णय भारतानं घेतला आहे. पाकिस्तानच्या नागरिकांना भारत सोडण्यासाठी ४८ तासांचा अवधी देण्यात आलाय. तसंच अटारी वाघा बॉर्डर (Attari - Wagah Border) पुढील सूचनेपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे.
या हल्ल्याचा भारतात काम करण्यासाठी उत्सुक असेलल्या पाकिस्तानी कलाकारांवर मोठा परिणाम झाला आहे. पाकिस्तानी अभिनेता फवाद खानच्या आगामी 'अबीर गुलाल' चित्रपटावर बंदी घातली आहे. हा चित्रपट आता भारतात प्रदर्शित होणार नाही. हा चित्रपट ९ मे रोजी रिलीज होणार होता. यासोबत हानिया आमिर एका पंजाबी चित्रपटात दिसणार होती. ती दिलजीत दोसांझसोबत 'सरदार जी 3' चित्रपटात दिसणार होती. पण, आता हासुद्धा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता आहे.