भारताआधी अमेरिकेत 'रामायण'चा टीझर रिलीज करण्याचं कारण काय? ट्रोल झाल्यानंतर निर्माते म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2026 13:15 IST2026-04-03T13:10:26+5:302026-04-03T13:15:45+5:30
'रामायण'चा टीझर भारताआधी अमेरिकेत का रिलीज केला? 'त्या' प्रश्नावर निर्मात्यांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...

भारताआधी अमेरिकेत 'रामायण'चा टीझर रिलीज करण्याचं कारण काय? ट्रोल झाल्यानंतर निर्माते म्हणाले...
Ramayana Movie: गेल्या काही काळापासून हिंदी चित्रपटसृष्टीत रणबीर कपूर स्टारर रामायण या सिनेमाची प्रचंड चर्चा होती. अखेर काल हनुमान जयंतीचं औचित्य साधून निर्मात्यांनी या चित्रपटाचा पहिला टीझर प्रदर्शित केला. या ऐतिहासिक सिनेमाचं दिग्दर्शन नितेश तिवारी यांनी केलं आहे. मात्र, भारतात 'रामायण'चा टीझर प्रदर्शित करण्यापूर्वी, दिग्दर्शक नितेश तिवारी आणि निर्माते नमित मल्होत्रा यांनी रणबीर कपूरसोबत अमेरिकेत चित्रपटाचा टीझर प्रदर्शित केला. यामुळे त्यांना टीकेला सामोरं जावं लागतं आहे. तसेच निर्मात्यांना फक्त पैसेच कमवायचे होते, असा आरोपही काहींना केला. यावर नमित यांनी सडेतोड उत्तर दिलं आहे.
अलिकडेच मुंबईत झालेल्या एका इव्हेंटमध्ये दिग्दर्शक नमित मल्होत्रा म्हणाले, "सध्या अमेरिकेत वास्तव्यास असणारे भारतीय आम्ही तिथे कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल आमचे आभार मानत आहेत आणि कौतुक करत आहेत. तुम्ही तिथल्या भारतीयांच्या भावना समजून घेतल्या पाहिजेत. जगभरात भारतीय लोक आहेत. आपल्यातच फूट पडू नये. रामायणाच्या बाबतीत आपली हीच चूक होते. तिथे कोणत्याही प्रकारची विभागणी नाही. हे एकच जग आहे, एकच रामायण आहे आणि एकच राम आहेत."
त्यानंतर नमित मल्होत्रा म्हणाले, " रामायण संपूर्ण जगासमोर सादर करणं हेच आमचं उद्दिष्ट आहे. प्रत्येक भारतीयाला ते रामायणाबद्दल माहीत आहे. पण, आम्हाला रामायण जगभरात पोहोचवायचे आहे. शंभरहून अधिक वर्षांत आम्ही पाश्चिमात्य देशांमध्ये कधीच आपला ठसा उमटवू शकलो नाही. असं नाही की आमच्याकडे चित्रपटांची कमतरता आहे; आम्ही देखील भव्य चित्रपट बनवतो."
त्या आरोपांवर नमित मल्होत्रा म्हणाले...
याचदरम्यान, प्रमोशन आणि प्रोडक्शनबद्दल बोलताना नमित मल्होत्रा यांनी म्हटलं, "रामायणाबद्दल सर्वांना माहिती व्हावी अशी माझी इच्छा आहे. शूटिंगच्या मध्येच काम थांबवून लोकांना भेटणे आणि जनजागृती करणे आमच्यासाठी अवघड आहे. परंतु आम्ही कुठेही तिकीट विक्री वगैरे केलेली नाही."
हनुमान जयंतीला चित्रपटातील हनुमानाच्या पात्राची किंवा कोणतीही झलक का दाखवली नाही? असा प्रश्न विचारणाऱ्या चाहत्यांना नमित मल्होत्रा यांनीही उत्तर दिले. ते म्हणाले, "जर संपूर्ण रामायण तयार असते, तर आम्ही ते तुम्हाला दाखवले असते. लोकांनी आम्हाला सुचवलं होतं आम्ही ते रामनवमीला सिनेमाचा टीझर आणावा. मी तुमच्या भावनांचा आदर करतो. कृपया धीर धरा, आम्ही भविष्यात आणखी काहीतरी उत्तम घेऊन येऊ."
नितेश तिवारींनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. 'दंगल', 'छिछोरे', 'बवाल', 'चिल्लर पार्टी' या गाजलेल्या आणि सुपरहिट सिनेमांचं दिग्दर्शन नितेश तिवारींनी केलं आहे. त्यामुळे 'रामायण' सिनेमाच्या माध्यमातून नितेश तिवारी काय कमाल करतात, याकडे सर्वांचं लक्ष आहे. याच वर्षी दिवाळीत 'रामायण' सिनेमाचा पहिला भाग रिलीज होणार आहे. तर दुसरा भागात पुढील वर्षी अर्थात २०२७ च्या दिवाळीत रिलीज होणार आहे.