"हा सिनेमा जर १५०००..."; मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानची रणवीर सिंगच्या 'धुरंधर'बद्दल टिप्पणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2026 11:37 IST2026-02-08T11:35:06+5:302026-02-08T11:37:32+5:30
बॉलिवूडचा मिस्टर परफेक्टनिस्ट आमिर खानने 'धुरंधर' सिनेमाला उद्देशून आमिरने टिप्पणी केली. आमिरने केलेलं विधान चांगलंच चर्चेत आहे

"हा सिनेमा जर १५०००..."; मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानची रणवीर सिंगच्या 'धुरंधर'बद्दल टिप्पणी
बॉलिवूडचा मिस्टर परफेक्टनिस्ट आमिर खानने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत भारतातील सिनेमागृहांच्या संख्येवर चिंता व्यक्त केली आहे. आमिरच्या मते, भारतालाचीनच्या बरोबरीने जाण्यासाठी आपल्या देशातील थिएटर्सची संख्या वाढवणे अत्यंत आवश्यक आहे. भारतामध्ये सध्या चीनच्या तुलनेत १० पटीने कमी स्क्रीन्स असल्याचे त्याने नमूद केले. याशिवाय 'धुरंधर' सिनेमाला उद्देशून आमिरने टिप्पणी केली.
'व्हरायटी इंडिया'ला दिलेल्या मुलाखतीत आमिर खान म्हणाला की, भारतात सध्या केवळ ९,००० स्क्रीन्स आहेत, तर चीनमध्ये ही संख्या लाखांच्या घरात आहे. तो म्हणाला, "चीनमध्ये जेव्हा एखादा मोठा चित्रपट प्रदर्शित होतो आणि तो तिथे चांगला चालतो, तेव्हा तो तब्बल २ अब्ज डॉलर्सची कमाई करतो. हे केवळ चीनमध्येच शक्य आहे कारण तिथे स्क्रीन्सची संख्या प्रचंड आहे. जर आपण आपल्या देशात ही संख्या वाढवली, तर आपल्याला व्यवसायात मोठा बदल पाहायला मिळेल."
आदित्य धर दिग्दर्शित आणि रणवीर सिंग अभिनित 'धुरंधर' या चित्रपटाचे उदाहरण देत आमिरने आपली भूमिका स्पष्ट केली. तो म्हणाला की, 'धुरंधर'ने आतापर्यंत १,३०० कोटी रुपयांहून अधिक कमाई केली आहे. मात्र, जर हा चित्रपट ५,००० स्क्रीन्सऐवजी १५,००० स्क्रीन्सवर प्रदर्शित झाला असता, तर या कमाईचा आकडा आणखी कितीतरी मोठा असता. देशातील अनेक जिल्ह्यांमध्ये आजही साधे सिंगल स्क्रीन थिएटर उपलब्ध नाही, ही वस्तुस्थिती त्याने अधोरेखित केली.
आमिरच्या मते, चित्रपट न चालण्यामागे किंवा कमी कमाई करण्यामागे थिएटर्सची कमी संख्या हे एक मोठे कारण आहे. तो म्हणाला की, खऱ्या अर्थाने मोठा बदल तेव्हाच येईल जेव्हा दुर्गम ग्रामीण भागातही थिएटर्स पोहोचतील. सध्या 'धुरंधर' चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होऊनही बॉक्स ऑफिसवर तग धरून आहे, ही सकारात्मक गोष्ट असल्याचेही त्याने नमूद केले.
'धुरंधर २' ची प्रतीक्षा
दरम्यान, ५ डिसेंबर २०२५ रोजी प्रदर्शित झालेल्या 'धुरंधर'ने जगभरात मोठी कमाई केल्यानंतर, आता प्रेक्षक त्याच्या सीक्वलची म्हणजे 'धुरंधर: द रिव्हेंज'ची वाट पाहत आहेत. हा चित्रपट १९ मार्च रोजी प्रदर्शित होणार असून त्याची टक्कर 'टॉक्सिक' या चित्रपटाशी होणार आहे. पुन्हा एकदा रणवीर सिंग, संजय दत्त, अर्जुन रामपाल, सारा अर्जुन, राकेश बेदी प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यास सज्ज आहेत.