जेव्हा वादांपासून दूर राहणा-या मनोज कुमार यांनी शाहरूख खानवर ठोकला होता मानहानीचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2019 06:00 IST2019-07-24T06:00:00+5:302019-07-24T06:00:02+5:30

ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार यांचा आज (24 जुलै) वाढदिवस. मनोज कुमार यांनी आपल्या अनेक अजरामर भूमिका साकारल्या. त्यांच्या देशभक्तीपर चित्रपटामुळे त्यांना एक वेगळी ओळखही मिळाली.  

manoj kumar birthday special shahrukh khan controversy |  जेव्हा वादांपासून दूर राहणा-या मनोज कुमार यांनी शाहरूख खानवर ठोकला होता मानहानीचा दावा

 जेव्हा वादांपासून दूर राहणा-या मनोज कुमार यांनी शाहरूख खानवर ठोकला होता मानहानीचा दावा

ठळक मुद्देदेशभक्तिपर चित्रपटांमुळे मनोज कुमार यांना आणखी एक नाव मिळाले. चाहत्यांनी त्यांना भारत कुमार हे नाव दिले.

ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार यांचा आज (24 जुलै) वाढदिवस. मनोज कुमार यांनी आपल्या अनेक अजरामर भूमिका साकारल्या. त्यांच्या देशभक्तीपर चित्रपटामुळे त्यांना एक वेगळी ओळखही मिळाली.  
 २४ जुलै १९३७ मध्ये तत्कालीन पाकिस्तानातील करनाल येथे एका ब्राह्मण कुटुंबात मनोज कुमार यांचा जन्म झाला. मनोज कुमार यांचे खरे नाव हरिकृष्ण गिरी गोस्वामी असे होते. फाळणीनंतर त्यांचे कुटुंब भारतात आले.

 मनोज कुमार हे दिलीप कुमार आणि अशोक कुमार यांचे खूप मोठे चाहते होते. त्यामुळेच चित्रपट सृष्टीत आल्यानंतर दिलीप कुमार यांच्या भूमिकेवरून त्यांनी आपले खरे नाव बदलून मनोज कुमार असे नामकरण केले. देशभक्तिपर चित्रपटांमुळे मनोज कुमार यांना आणखी एक नाव मिळाले. चाहत्यांनी त्यांना भारत कुमार हे नाव दिले.

मनोज कुमार हे कायम वादांपासून दूर राहिलेत. त्यांचा ना कुठल्या अभिनेत्याशी वाद  झाला, ना दिग्दर्शक-निर्मात्याशी. पण शाहरूख खानसोबतचा त्यांचा एक वाद मात्र चांगलाच गाजला होता. या वादानंतर शाहरूखला मनोज कुमार यांची माफीही मागावी लागली होती. 

2007 मध्ये शाहरूखचा ‘ओम शांती ओम’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या सिनेमातील एका दृश्यात शाहरुखने त्याचा सहकलाकार श्रेयस तळपदेबरोबर मनोज कुमार यांच्या प्रमाणे आपल्या चेह-यावर हात ठेऊन त्यांची खिल्ली उडवली होती. या दृश्यावर मनोज कुमार यांनी आक्षेप नोंदवला होता. वाद वाढताच  निर्मात्यांनी हे वादग्रस्त दृश्य चित्रपटातून गाळण्याचा शब्द दिला होता. शहरूखने याप्रकरणी ई-मेलवरून मनोज कुमार यांची माफीही मागितली होती. पण प्रत्यक्षात संबंधित दृश्य न गाळताच जपानमध्ये हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला. मनोज कुमार यामुळे बिथरले आणि त्यांनी याविरोधात कोर्टाचा दरवाजा ठोठावत मानहानीचा दावा दाखल केला . अर्थात नंतर शाहरूख व ‘ओम शांती ओम’ची दिग्दर्शिका फराह खान यांनी पुन्हा एकदा मनोज कुमार यांची माफी मागितली. तेव्हा कुठे मनोज कुमार यांनी ही केस मागे घेतली होती.

Web Title: manoj kumar birthday special shahrukh khan controversy