'बूंग'च्या दिग्दर्शिका लक्ष्मीप्रिया देवी यांनी BAFTA विजयाबद्दल मानले आभार, म्हणाल्या- "मला खरोखर..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2026 12:46 IST2026-02-25T12:45:19+5:302026-02-25T12:46:42+5:30
लक्ष्मीप्रिया देवी यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या या कमिंग-ऑफ-एज ड्रामाने British Academy Film Awardsच्या 79व्या सोहळ्यात ‘बेस्ट चिल्ड्रन्स अँड फॅमिली फिल्म’ हा पुरस्कार जिंकत हा मान मिळवणारा पहिला भारतीय चित्रपट ठरला आहे.

'बूंग'च्या दिग्दर्शिका लक्ष्मीप्रिया देवी यांनी BAFTA विजयाबद्दल मानले आभार, म्हणाल्या- "मला खरोखर..."
रितेश सिधवानी आणि फरहान अख्तर यांच्या एक्सेल एंटरटेनमेंट, चॉकबोर्ड एंटरटेनमेंट आणि सूटेबल पिक्चर्स यांच्या सहकार्याने तयार झालेल्या ‘बूंग’ या चित्रपटाने इतिहास घडवला आहे. लक्ष्मीप्रिया देवी यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या या कमिंग-ऑफ-एज ड्रामाने British Academy Film Awardsच्या 79व्या सोहळ्यात ‘बेस्ट चिल्ड्रन्स अँड फॅमिली फिल्म’ हा पुरस्कार जिंकत हा मान मिळवणारा पहिला भारतीय चित्रपट ठरला आहे.
या ऐतिहासिक विजयाबद्दल आनंद व्यक्त करताना लक्ष्मीप्रिया देवी यांनी सर्वांचे मनापासून आभार मानले. त्यांना पूर्ण विश्वास आहे की ज्यांनी ज्यांनी हा चित्रपट पाहिला, त्यांच्या शुभेच्छा आणि प्रेमामुळेच हे यश शक्य झाले. त्या म्हणाल्या, “मी सर्वांचे आभार मानू इच्छिते, कारण मला खरोखर वाटते की चित्रपट पाहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने या विजयासाठी मनापासून प्रार्थना केली होती. दोन दिवस उलटून गेले तरीही मी अजून लोकांना ‘धन्यवाद’चे संदेश पाठवत आहे.”
काय आहे सिनेमाची कथा?
ही कथा एका लहान मुलाभोवती फिरते, जो आपल्या आईला जगातील सर्वात मोठी भेट द्यायची इच्छा बाळगतो — ती म्हणजे त्याच्या हरवलेल्या वडिलांना परत घरी आणणे. त्याला ठाम विश्वास असतो की आई-वडील पुन्हा एकत्र आले तर आईचं हरवलेलं सुख परत येईल. या आशेने तो वडिलांच्या शोधात निघतो. या प्रवासात त्याची ही छोटीशी इच्छा हळूहळू प्रेम, कुटुंब आणि विरहाच्या वेदनेची सखोल जाणीव करून देते आणि शेवटी एक हृदयस्पर्शी व अनपेक्षित शेवट घडवते.
लक्ष्मीप्रिया देवी यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेला ‘बूंग’ हा मुलांवर आधारित अतिशय भावनिक आणि सुंदर चित्रपट असून त्याने जगभरातील अनेक मोठ्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये सहभाग नोंदवला आहे. भारतातील एका छोट्या प्रदेशातील कथा देखील जगभरातील प्रेक्षकांच्या मनाला स्पर्श करू शकते, हे या चित्रपटाने प्रभावीपणे दाखवून दिले आहे. त्याची साधी मांडणी, कथनशैलीतील सहजता आणि खरेखुरे भावविश्व यामुळे सर्वत्र त्याचे कौतुक झाले आहे.