अजामीनपात्र वॉरंट जारी झाल्यावर अमीषा पटेलची पहिली प्रतिक्रिया; म्हणाली- "अशा लोकांमुळे..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2026 09:38 IST2026-02-17T09:32:50+5:302026-02-17T09:38:35+5:30
२०१७ मधील एका इव्हेंटशी संबंधित फसवणुकीच्या आरोपावरून मुरादाबादच्या न्यायालयाने सोमवारी अमीषाच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे.

अजामीनपात्र वॉरंट जारी झाल्यावर अमीषा पटेलची पहिली प्रतिक्रिया; म्हणाली- "अशा लोकांमुळे..."
बॉलिवूड अभिनेत्री अमीषा पटेल सध्या एका जुन्या कायदेशीर प्रकरणामुळे पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. २०१७ मधील एका इव्हेंटशी संबंधित फसवणुकीच्या आरोपावरून मुरादाबादच्या न्यायालयाने सोमवारी अमीषाच्या विरोधात अजामीनपात्र वारंट (Non-Bailable Warrant) जारी केले आहे. वारंवार समन्स बजावूनही सुनावणीला अनुपस्थित राहिल्यामुळे न्यायालयाने हे कडक पावलं उचलली आहेत. आता यावर अमीषाने तिचं मत व्यक्त केलंय.
अमीषा पटेलने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. अमीषाच्या म्हणण्यानुसार, हे प्रकरण जुनं आहे आणि पवन वर्मासोबत यापूर्वीच 'सेटलमेंट' झाली आहे. इतकंच नव्हे त्याने पत्रावर सही करून पूर्ण रक्कम स्वीकारली होती. "केवळ प्रसिद्धी मिळवण्यासाठी आणि खोटे आरोप लावून हे नाटक रचले जात आहे. अशा लोकांमुळे मी माझ्या कामावर परिणाम होऊ देणार नाही," असे तिने स्पष्ट केले. तसेच, आपल्या वकिलांमार्फत पवन वर्मा याच्या विरोधात फसवणुकीची कायदेशीर कारवाई करणार असल्याचेही तिने सांगितले आहे.

नेमकं प्रकरण काय?
हे संपूर्ण प्रकरण सुमारे आठ वर्षांपूर्वीचे आहे. मुरादाबाद येथील इव्हेंट मॅनेजर पवन वर्मा यांनी अमीषा पटेल आणि तिच्या टीमवर गंभीर आरोप केले होते. त्यांच्या तक्रारीनुसार, एका लग्न समारंभात उपस्थित राहण्यासाठी अमीषाने ११ लाख रुपये मानधन घेतले होते. ठरल्याप्रमाणे ती मुंबईहून दिल्लीला पोहोचली, मात्र तिथे आल्यावर तिने आणखी २ लाख रुपयांची मागणी केली. इव्हेंट कंपनीने ही वाढीव रक्कम देण्यास नकार दिल्यानंतर, अमीषा कार्यक्रमाला न जाताच तिथून मुंबईला परतली, असा आरोप पवन वर्मा यांनी केला आहे. यामुळे आपले आर्थिक नुकसान झाल्याचा दावा करत त्यांनी न्यायालयात धाव घेतली होती.
दरम्यान, दोन वर्षांपूर्वी अमीषा मुरादाबाद न्यायालयात हजर झाली होती आणि त्यावेळी तिला जामीन मंजूर करण्यात आला होता. मात्र, जामिनाच्या अटींचे उल्लंघन केल्यामुळे आणि सुनावणीदरम्यान सातत्याने गैरहजर राहिल्यामुळे न्यायालयाने आता तिच्या विरोधात अजामीनपात्र वारंट काढले आहे. जर ती २७ मार्चच्या सुनावणीला हजर झाली नाही, तर तिला अटक होण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे.