"मी दिलजीतच्या जागेवर असतो तर..."; पाक अभिनेत्रीला चित्रपटात घेण्यावरून आदित्य नारायण काय म्हणाला?
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2025 13:38 IST2025-06-30T13:35:52+5:302025-06-30T13:38:55+5:30
'सरदार जी-३'च्या वादात आदित्य नारायणची उडी, हानिया आमिरच्या कास्टिंबद्दल बोलताना म्हणाला...

"मी दिलजीतच्या जागेवर असतो तर..."; पाक अभिनेत्रीला चित्रपटात घेण्यावरून आदित्य नारायण काय म्हणाला?
Aditya Narayan : अभिनेता दिलजीत दोसांझ (Diljit Dosajh) सध्या त्याचा 'सरदारजी-३' या चित्रपटामुळे प्रचंड चर्चेत आहे. दिलजीतच्या या चित्रपटात पाकिस्तानी अभिनेत्री हानिया आमिरच्या कास्टिंगमुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. ऑपरेशन सिंदुरनंतर भारतात पाकिस्तानी कलाकारांनी काम करण्यास बंदी घालण्यात आली होती. त्यानंतर आता दिलजीतच्या चित्रपटात हानिया आमिरची भूमिका असल्याने अनेकांना संताप व्यक्त केला आहे. त्यात आता या प्रकरणी लोकप्रिय गायक आदित्य नारायणने (Aditya Narayan) प्रतिक्रिया दिली आहे.
अलिकडेच गायक आदित्य नारायणने न्यूज १८ सोबत संवाद साधला. त्यादरम्यान, आदित्य म्हणाला, "मला याबद्दल काय बोलावं हेच कळत नाही आहे. मी एक कट्टर देशभक्त आहे. माझ्यासाठी देश प्रथम स्थानी आहे. पण, आपला शेजारी देश पाकिस्तानची दहशतवादाला पाठिंबा करणं ही सवयच आहे. आपण भारतीय म्हणून कायम प्रेम आणि एकतेचा संदेश देत आलो आहोत.
वसुधैव कुटुंबकम यावर आपण विश्वास ठेवणारे लोक आहोत. परंतु, आपण अजून किती सहन करायचं जे चुकीचं आहे त्याला चुकीचं म्हटलंच पाहिजे. आता ते सगळं बोलणं योग्य नाही. पण, त्या घटनेच्या जखमा अजूनही ताज्या आहेत."
दिलजीतबद्दल आदित्य काय म्हणाला...
"जेव्हा चित्रपटाचं कास्टिंग झालं तेव्हा दोन्ही देशांमध्ये तणावपूर्ण वातावरण नव्हतं. त्यानंतर अशी परिस्थिती निर्माण झाली. पण, खरं सांगायचं झालं तर मी देशाला पहिलं प्राधान्य देईन." त्यानंतर आदित्य म्हणाला. "मी जर दिलजीतच्या जागी असतो तर माझ्यासाठी देश पहिला असता. "बदल होणं हे गरजेचं आहे. हा एक अतिशय संवेदनशील विषय आहे. सध्या सोशल मीडियावर प्रत्येक गोष्टीवर ट्रोल केलं जातं. पण हे माझे विचार आहेत."अशा भावना त्याने व्यक्त केल्या.