'द केरळ स्टोरी' फेम अदा शर्माने सांगितला 'तो' प्रसंग, म्हणाली, "वडिलांचं निधन झालं तेव्हा रडलेच नाही"
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2023 16:44 IST2023-05-29T16:43:11+5:302023-05-29T16:44:04+5:30
अदा शर्माची ही मुलाखत खूपच व्हायरल होत आहे.

'द केरळ स्टोरी' फेम अदा शर्माने सांगितला 'तो' प्रसंग, म्हणाली, "वडिलांचं निधन झालं तेव्हा रडलेच नाही"
'द केरळ स्टोरी' (The Kerala Story) सिनेमामुळे चर्चेत आलेली अभिनेत्री अदा शर्मा (Adah Sharma) हिची क्रेझ दिवसेंदिवस वाढतच आहे. मराठी भाषेत पोस्ट केलेल्या काही व्हिडिओमुळेही ती तुफान व्हायरल झाली होती. तर अदा शर्माने तिच्या स्वभावाबाबतीत नुकताच खुलासा केला आहे.तिला कोणत्याच भावना जाहीरपणे दाखवता येत नाहीत. वडीलांच्या निधनानंतरही रडू आलं नसल्याचा खुलासा तिने केला आहे. अदा शर्माची ही मुलाखत खूपच व्हायरल होत आहे.
सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर सिद्धार्थ कननने अदा शर्माची मुलाखत घेतली. खऱ्या आयुष्यात तू कधी एकटीच कोपऱ्यात बसून खूप रडली आहेस का असा पॅच तुझ्या आयुष्यात कधी आलाय का असा प्रश्न त्याने अदाला विचारला. यावर ती म्हणाली, "मी कधीच रडत नाही. खरंतर मी कोणत्याच भावना खुलेपणाने दाखवू शकत नाही. राग, दु:ख, आनंद सगळंच माझं नियंत्रणात असतं. मला खूप राग आला तर मी ओरडत नाही, किंवा काही चांगली गोष्टी झाली की मी आनंदाने हुरळून जात नाही. तसंच दु:ख झालं तर मी रडतही बसत नाही."
ती पुढे म्हणाली, "मला आठवतंय माझ्या वडिलांचं निधन झालं तेव्हाही मी रडले नाही. मी फक्त धक्क्यात होते. माझे वडील पेपर वाचत बसले होते. आई अचानक ओरडतच मला उठवायला आली. कारण वडील आहे तसेच खुर्चीत न हालचाल करता बसले होते. आम्ही वडिलांजवळ गेलो, मला वाटलं ते नाटक करत आहेत म्हणून मी त्यांना हलवलं तर ते एका बाजूला पडले. आम्ही लगेच डॉक्टरांना बोलावलं. तर त्यांनी निधन झाल्याचं सांगितलं. मी पूर्णपणे धक्क्यात होते. मला रडू आलं नाही पण आता काय करायचं हे काय झालं कारण हे अगदीच अचानक झालं होतं."
अदाची ही मुलाखत सध्या व्हायरल होत आहे. अनेकांनी अदाला पाठिंबा देत होय मलाही भावना व्यक्त करता येत नाही अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत. अदाचा 'द केरळ स्टोरी' सिनेमामुळे सुपरहिट झाली आहे. आता ती 'द गेम ऑफ गिरगीट' सिनेमात दिसणार आहे. यामध्ये श्रेयस तळपदे मुख्य भूमिकेत आहे.