"हिंदी चित्रपटांमध्ये काम करताना मला...", प्रियंका चोप्राने 'या' कारणामुळे सोडलं बॉलिवूड, स्वत:च केला खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2026 09:34 IST2026-02-21T09:34:05+5:302026-02-21T09:34:41+5:30
"मला कधीच बॉलिवूड सोडायचं नव्हतं, पण...", प्रियंका चोप्रा नेमकं काय म्हणाली?

"हिंदी चित्रपटांमध्ये काम करताना मला...", प्रियंका चोप्राने 'या' कारणामुळे सोडलं बॉलिवूड, स्वत:च केला खुलासा
Priyanka Chopra: हिंदी चित्रपटसृष्टीत अभिनेत्री म्हणून येण्याचा राजमार्ग सौंदर्य स्पर्धातून येतो. मात्र या सौंदर्य स्पर्धातून विजेत्या ठरलेल्या सर्वच सुंदरी अभिनेत्री म्हणून आपलं आव्हान टिकवून ठेवू शकत नाही. पण जिने सौंदर्य स्पर्धा जिंकल्यानंतर हिंदी चित्रपटसृष्टीतच नव्हे तर हॉलिवूडमध्येही आपलं बस्तान बसवलं अशी अभिनेत्री म्हणजे प्रियंका चोप्रा. मिस वर्ल्ड झाल्यानंतर हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात महागडी अभिनेत्री, अमेरिकन सिनेसृष्टीतही आपल्या अभिनयाने रसिकांची मने जिंकणार्या प्रियंकाने राष्ट्रीय पुरस्कारासह पाच कॅटेगरीमधील फिल्मफेअर, 2016 मध्ये पद्मश्री पुरस्कारावर आपलं नाव कोरलं आहे. बॉलिवूड गाजवल्यानंतर अभिनेत्री हॉलिवूडमध्ये स्थिरावली आहे. मात्र, अभिनेत्रीचा हा प्रवास सोपा नव्हता.नुकत्याच एका मुलाखतीत तिने आपल्या या निर्णयावर भाष्य केलं आहे.
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!
प्रियंकाने 2003 आलेल्या 'द हीरो- लव स्टोरी ऑफ स्पाय' या चित्रपटातून इंडस्ट्रीत पदार्पण केलं. यात प्रियंका सेकंड लीड भूमिकेत होती. 'एतराज', 'सलाम ए इश्क', 'फॅशन' तसेच अलिकडेच आलेले 'बर्फी', मेरी कॉम',' बाजीराव मस्तानी' या चित्रपटांमुळे तिच्या करिअरचा आलेख उंचावला. मात्र, यशाच्या शिखरावर असताना प्रियंकाने बॉलिवूड सोडण्याचा निर्णय घेतला. अलिकडेच 'फर्स्ट स्पॉट'ला दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्रीने सांगितलं... तिने बॉलिवूड सोडून बाहेर कामं शोधायला सुरुवात केली याचं कारण म्हणजे, तिला इंडस्ट्रीत रोखून धरल्यासारखं वाटत होतं. आपल्या वाट्याला हव्या तशा भूमिका येत नसल्यामुळे हा निर्णय घेतल्याचं यावेळी अभिनेत्रीने स्पष्टपणे सांगितलं. ती म्हणाली, "मला कधीच बॉलिवूड सोडायचं नव्हतं. पण, हिंदी चित्रपटांमध्ये काम करताना मला रोखून धरल्यासारखं तसंच थांबवल्यासारखं वाटत होतं. एक कलाकार म्हणून मी चांगल्या संधीच्या शोधात होते. त्यानंतर मग मी अमेरिकेत काम करायला सुरुवात केली." असं अभिनेत्रीने या मुलाखतीत सांगितलं.
आता लवकरच प्रियंका एस.एस.राजामौलींच्या वाराणसी या चित्र6पटातून इंडस्ट्रीत कमबॅक करते आहे. मिडिया रिपोर्टनुसार, २०१९ पासून प्रियंकाने कोणत्याही बॉलिवूड सिनेमात काम केलेलं नाही. आता वाराणसी या दाक्षिणात्य सिनेमातून ती प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यास सज्ज झाली आहे. या चित्रपटाबद्दल बोलताना अभिनेत्री म्हणाली," मला भारतीय चित्रपटांमध्ये काम करणं खरंच खूप आवडतं. त्यामुळे वाराणसी या चित्रपटामुळे मी खूप आनंदी झाले आहे. मला दोन्हीकडे काम करणं आवडतं." असं स्पष्ट मत अभिनेत्रीने मांडलं.