'नटरंग'साठी अतुल कुलकर्णी नाहीतर 'हा' अभिनेता होता दिग्दर्शकाची पहिली पसंती, मग कुठे बिनसलं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2026 15:15 IST2026-01-10T15:01:33+5:302026-01-10T15:15:07+5:30
अतुल कुलकर्णी नव्हे तर 'नटरंग'मध्ये दिसला असता 'हा' अभिनेता! दिग्दर्शक रवी जाधव यांचा खुलासा,म्हणाले...

'नटरंग'साठी अतुल कुलकर्णी नाहीतर 'हा' अभिनेता होता दिग्दर्शकाची पहिली पसंती, मग कुठे बिनसलं?
Ravi Jadhav On Natarag:रवी जाधव दिग्दर्शित नटरंग हा सिनेमा साल २०१० मध्ये प्रदर्शित झाला.या चित्रपटाने त्यावेळी अमाप लोकप्रियता मिळवत प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं.तसंच विविध अन्य पुरस्कार सोहळ्यातही नटरंगने बाजी मारली. 'नटरंग' हा त्यांनी दिग्दर्शित केलेला पहिला सिनेमा. त्यानंतर रवी जाधव 'नटरंग', 'बालाक पालक', 'टाईमपास' , 'टाईमपास 2', 'न्युड' आणि 'हिंदी बँजो' असे हटके सिनेमा दिग्दर्शित करत सिनेसृष्टी आणि रसिकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं. नटरंगमध्ये गुणवंतराव अर्थात गुणा कागलकर हे पात्र अतुल कुलकर्णी यांनी साकारलं होतं. मात्र, तुम्हाला माहितीये का भूमिकेसाठी अतुल दिग्दर्शकाची पहिली पसंत नव्हते? नुकतीच रवी जाधव यांनी दिलेल्या मुलाखतीत नटरंगच्या कास्टिंगचा किस्सा शेअर केला.
अमोल परचुरेंच्या कॅच अप या मराठी पॉडकास्टमध्ये बोलताना त्यांनी नटरंग सिनेमाचे अनेक किस्से शेअर केले. या मुलाखतीत ते म्हणाले,"नटरंगमध्ये अतुल हे मी केलेलं कास्टिंग नव्हतं, माझं पहिलं कास्टिंग होतं ते आदेश बांदेकरचं होतं. खरंतर अजय-अतुलशी माझी ओळख आदेश बांदेकरनेच करून दिली होती, तो आधीपासून झी गौरव वगैरे करायचा, त्यामुळे त्याचा संपर्क होता. माझा त्यांच्याशी थेट संपर्क नव्हता. "
यानंतर नटरंगच्या कास्टिंगचा किस्सा सांगत ते म्हणाले, अतुलचं कास्टिंग झीने केलं. निखिल साने, वैद्य यांनी ते कास्टिंग केलं. मुळात ते चॅनेलसाठी काम करतात त्यामुळे त्यांची दूरदृष्टी होती, प्रेक्षकांचा अभ्यास होता. ते म्हणाले की, अतुल आला तर त्या सिनेमाचं अजून वेगळं काहीतरी होऊ शकेल आणि ते झालं. अतुलने ज्या पद्धतीने या सिनेमात स्वत:ला समर्पित केलं, त्याने जी मेहनत केली त्याला तोड नाही.
पुढे रवी जाधव म्हणाले,"आपण दिग्दर्शक म्हणून स्वार्थी असतो,'रंग दे बसंती'सारख्या चित्रपटात काम केलेला अतुल जेव्हा मराठीत काम करतोय, तो आपल्या सिनेमासाठी एवढी मेहनत करतोय, शिवाय सिनेमातील लहान-लहान गोष्टींवर काम करतोय. त्यातून आपण तयार होत जातो.आपल्याला खूप काही शिकायला मिळतं. पहिल्याच सिनेमात मला अशी माणसं आजूबाजूला भेटली की, ज्यांच्याकडून मी हळूहळू समृद्ध होत गेलो. मला हळूहळू ती भाषा कळत गेली. जेव्हा मला कळलं की अतुल कुलकर्णीला स्क्रिप्ट ऐकवायची आहे तेव्हा मी संपूर्ण प्रेझेंटेशन पुन्हा केलं होतं. कारण, मला माहितीये त्याचे प्रश्न असणार. त्याचं व्हिजन काय असणार ... आम्ही त्या पद्धतीने हे केलं. "
अतुल कुलकर्णीचं कौतुक करत म्हणाले...
"खरंतर,अतुलने अप्रतिम काम केलं. गुणाचा पैलवान होणं, तो बारीक होणं याबद्दल मी कल्पनाच केली नव्हती. ते अतुलला कुठे दिसलं की, ही दोन रुपं झाली तर खूप मजा येईल.ट्रान्सफॉर्मेशनसाठी तर त्याला सलाम आहे. हॅट्स ऑफ शब्दही छोटा आहे. हल्ली एवढं समर्पण पाहायला नाही मिळत. हल्ली लोकं एक सिनेमा करतात आणि मग त्याचवेळी त्यांची एक मालिका सुरू असते. त्यात एवढं ट्रान्सफॉर्मेशन करुन घेणं आणि त्या काळात दुसरं काहीही न करणं कठीण आहे.मी नशीबवान होतो की, मला अशी माणसं मिळाली."