शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
2
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
3
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
4
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
5
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
6
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
7
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
8
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
9
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
10
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
11
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
12
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
13
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
14
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
15
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
16
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
17
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
18
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
19
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
20
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
Daily Top 2Weekly Top 5

नांगरणी

By admin | Updated: May 30, 2016 03:04 IST

समाजपुरुषाचे लघुरूप म्हणून मानवी शरीराचा विचार करण्याची विचारदिशा फार प्राचीन आहे.

समाजपुरुषाचे लघुरूप म्हणून मानवी शरीराचा विचार करण्याची विचारदिशा फार प्राचीन आहे. भगवान गौतम बुद्धांच्या जीवनातील एक कथा या संदर्भात विलक्षण बोलकी ठरते. पावसाळा तोंडावर आल्याने पेरणीची लगबग सर्वत्र सुरू असताना बुद्ध एका शेताच्या मेरेवरून चालले होते. रानात शेतकऱ्याने औत धरले होते. मन लावून शेतकरी औत हाकत होता. मात्र औताचा तास तिरकाच पडत राहिल्याचे बुद्धांच्या ध्यानात आले. ‘‘अरे, तुझा तास सरळ नाही तर तिरका आहे,’’ असे बुद्धांनी टोकताच, नाही म्हटले तरी शेतकरी वरमलाच. ‘‘अहो संन्यासीबाबा, औत हाकण्यातले आपल्याला काय कळते? आपण काय शेतकरी आहात का?’’ शेतकऱ्याने भगवान बुद्धांना अंमळ त्रासूनच प्रश्न केला. मुखावरची शांती आणि हासू कणभरही ढळू न देता बुद्ध उत्तरले, ‘‘होय, मीसुद्धा तुझ्यासारखा एक शेतकरीच आहे.’’ आता अचंबित होण्याची पाळी होती शेतकऱ्याची! ‘‘महाराज आपण कधी शेती केलीत? कोठे आहे तुमचे शेत?’’ तो शेतकरी विचारता झाला. बुद्ध हसले. म्हणाले, ‘‘अरे, हे माझे शरीर दिसते आहे ना तेच माझे शेत. यातील मन हेच माझे वावर. त्याची नांगरणी करण्यासाठी विवेकाचा नांगर मी त्यांत घालतो. अनिष्ट विचार आणि कुवासनांची धसकटे वेचून काढतो. वैराग्यरूपी अग्नीने राब जाळतो. सद्विचारांचे बीज पेरतो. निर्मळ प्रज्ञेचे सिंचन पुरवतो आणि त्या माझ्या वावरातून निर्वाणाचे अमूप पीक मी पदरात पाडून घेतो.’’ एवढं उत्तर देऊन भगवान आपल्या वाटेने शांतपणे निघून गेले! समाजरूपी शेताची निगराणी संतविचार याच भूमिकेतून करत आलेले आहे. विवेकाचा आग्रह ही परंपरा प्रकर्षाने धरते त्याचसाठी. विवेकाच्या नांगराने आपण आपल्या मनाची भूमी सतत नांगरायची असते. या नांगरणीमध्ये खंड पडता कामा नये. परंतु, विवेकाचा नांगर हाती पेलून मनरूपी शेताची नांगरट अविरत चालू ठेवणे, हे विलक्षण धैर्याचे काम होय. कारण, विवेकाच्या आधारे जीवनाची वाटचाल सुरू राखणे, हे असिधारा व्रतच जणू! म्हणूनच की काय, पण, ‘देह’गाव वसवण्याचे कौलपत्र सुपूर्त केलेल्या ‘जिवा’जीपंत ठाणेदाराला ‘आत्मा’रामपंत कमाविसदार एक मोठा सावधगिरीचा इशारा देऊन ठेवतात. एकनाथांच्या व्यक्तिमत्त्वात भिनलेला समाजमनस्क संत या ठिकाणी आपल्याला अतिशय ठसठशीतपणे प्रतीत होतो. ‘आत्मा’रामपंत ‘जिवा’जीपंतांना बजावतात, ‘‘धैर्याचा नांगर धरून। शेतांमधील खडे काढून। वासनेच्या पालव्या तोडून। संशयाच्या काशा गोळा करून।’’ गावची लावणी करणे. संतपरंपरेने आपल्याला परोपरीने केलेल्या या बोधाचाच नेमका विसर आज पडतो आहे का? विवेकाचा नांगर आपण गुंडाळून अडगळीत फेकून दिलेला आहे का? मनरूपी शेताची मशागत जागृतीने करण्यासाठी ‘विवेकाचा नांगर धरा’ या आवाहनाचा विचार आपण केव्हा करणार? या नांगरणीला आपण अजून किती उशीर लावणार?-अभय टिळक