अध्यात्म
मोहनबुवा रामदासीजयाचेनि नामे महादोष जाती।जयाचेनि नामे गती पाविजेती।जयाचेनि नामे घडे पुण्यठेवा।प्रभाते मनी राम चिंतीत जावा।।श्लोकार्थ- ज्याच्या नामोच्चाराने जन्मजन्मांतराची महापापे दूर होतात, ज्याच्या नामोच्चाराने साधकाला सद्गती व मोक्ष प्राप्त होतो, ज्याच्या नामस्मरणाने सहजगत्या पुण्यसंचय होत जातो, अशा त्या प्रभू रामचंद्रांचे पहाटेच्या वेळी चिंतन करावे. या श्लोकापासून पुढे समर्थांनी नाममाहात्म्य वर्णन केले आहे. या श्लोकात रामनामाने देहशुद्धी होऊन पावित्र्य कसे प्राप्त होते, सद्गती कशी लाभते आणि पुण्यसंचय कसा होतो हे समर्थ सांगतात.मानवी देह म्हणजे दोषांचे आगर. ‘‘शरीर दु:खाचे कोठार। शरीर रोगाचे भांडार। शरीर दुर्गंधीचा थार। नाही अपवित्र शरीर ऐसे।।’’ स्थूल देहाच्या अपवित्रपणाची यादीच पहा ना! जिवाचे जन्मस्थळच अमंगळ, अशौच, मरणानंतरसुद्धा अशौच. स्वत: अपवित्र आहेच; पण ज्या वस्तूशी त्याचा संबंध येईल, ती वस्तूही अपवित्र करते. स्थूल देह मलमूत्रादिकांमुळे अपवित्र तर सूक्ष्म देह म्हणजे मन, बुद्धी वगैरे कामक्रोधादिक विकारांनी अपवित्र. या विकारांना गीतेत नरकाची द्वारे म्हटले आहे. तात्पर्य, सूक्ष्म शरीर हे महादोषांचे स्थान असल्याने त्याची शुद्धी नामानेच होते. मन हे चिंतनशील असल्याने त्याचे विषय चिंतन स्वाभाविकपणे नित्य चालू असते. हे ईशस्मरण नामानेच सतत राहू शकते म्हणून नामाला महत्त्व. इतर साधनांनी चित्ताला येणारी पवित्रता पुन्हा मलिन होते व ‘गिरिवर। नाममात्रे नासती।।’ (दा. ४-३-२२) नामाने उत्तम गती म्हणजे उत्तम अवस्था प्राप्त होते. समर्थ सांगतात, ‘‘नामे विषबाधा हरती। नामे चेडे चेटके नासती। नामे कोय उत्तमगती। अंतकाळी।।’’ (दा. ४-३-१३) परंतु ईश्वरकृपा होण्याइतकी पात्रता येण्यापूर्वीच देहाचा अंत झाला तर? या जन्मात घेतलेले नाम वाया जात नाही. त्या पुण्याईची ठेव सूक्ष्म देहात सुरक्षित राहते व पुन: नरजन्म येऊन ती पुण्याई सद्गती प्राप्त करून देण्यास उपयोगी पडते.