शहरं
Join us  
Trending Stories
1
'सेव्हन सिस्टर्स' तोडण्याची धमकी खरी होणार; शेख हसीनांच्या मुलाने भारताला केले अलर्ट
2
फोर्डचा मोठा निर्णय! LG सोबतचा ५८,७३० कोटींचा बॅटरी करार रद्द; डोनाल्ड ट्रम्प ठरले व्हिलन...
3
पट्ट्याने मारहाण, तोंड दाबलं; ईश्वरपुरात आठवीतील मुलीवर ओळखीतल्याच दोघांकडून बलात्कार, विवस्त्र अवस्थेतच आली चालत
4
Stock Market Today: शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात; सेन्सेक्स १५० अंकांनी घसरला, IT, PSU Bank मध्ये तेजी
5
'शांतता चर्चा केली नाही तर युक्रेनचा आणखी भाग बळकावू'; व्लादिमीर पुतीन यांची धमकी, युरोपीय नेत्यांना म्हणाले डुकराच्या औलादी
6
Big Banks Rate Cut: नव्या वर्षाच्या आधीच खूशखबर! SBI, PNB सह 'या' ८ बँकांनी स्वस्त केले व्याजदर, किती कमी होणार EMI?
7
२ कोटींपर्यंत दंड अन् बंद होणार विद्यापीठ?; केंद्र सरकार करणार उच्च शिक्षण क्षेत्रात मोठा बदल
8
Rana Daggubati Weight Loss: नॉनव्हेज पूर्ण बंद, मीठ कमी आणि...; तब्बल ३० किलो वजन घटवण्याचा 'भल्लालदेव' फॉर्म्युला
9
शिक्षणासाठी रशियाला गेला, युक्रेन युद्धात मृत्यू झाला; आधीच MEA कडून सुरक्षा मागितली होती
10
ढाका येथे उच्चायुक्त कार्यालयाबाहेर आंदोलन; बांगलादेशी कट्टरपंथी नेत्याची भारताला पोकळ धमकी
11
अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय
12
Ram Sutar Death: शिल्पकलेचा उपासक काळाच्या पडद्याआड! महाराष्ट्र भूषण राम सुतार यांचे निधन
13
'धुरंधर'ला मिळालेलं प्रेम पाहून अखेर अक्षय खन्नाने दिली पहिली प्रतिक्रिया, तीन शब्दांत म्हणाला-
14
दिल्ली-एनसीआर दाट धुक्यात बुडाले, IND विरुद्ध SA चौथा T20I सामना रद्द; दृश्यमानता शून्यावर
15
SEBI नं तीन दशकं जुन्या ब्रोकिंगच्या नियमांत केले महत्त्वाचे बदल; अनेक मोठ्या सुधारणांनाही मंजुरी, जाणून घ्या
16
...तर पाकिस्तानात उद्रेक होणार?, फिल्ड मार्शल असीम मुनीर संकटात सापडले; अमेरिकेचा दबाव वाढला
17
नाशिकमध्ये भाजपा-शिंदेसेना महायुतीत ८५-३७ चा फॉर्म्युला; उद्धवसेना-मनसेचं तगडं आव्हान
18
आजचे राशीभविष्य, १८ डिसेंबर २०२५: या राशींना धनप्राप्ती होईल, आज यांचे विवाह जुळतील
19
आता कुठे गेले कोपर-ढोपर? आयपीएलचे करोडोंचे लिलाव आणि हतबल शेतकऱ्याची 'किडनी' विक्री
20
जास्त पीक! शेतात तयार झाल्या प्रचंड 'विहिरी'! तुर्कीतील शेतकऱ्यांनी स्वतःहून ओढवून घेतलेली आपत्ती
Daily Top 2Weekly Top 5

मल्ल्याचे सरकारी साथीदारही शोधा

By admin | Updated: April 21, 2017 01:44 IST

जगातील पहिल्या पाच जणांत बसणारा भारतीय दारूविक्रेता, आपल्या मुलाच्या वाढदिवसाला त्याला अख्खी विमानकंपनी भेट देणारा धनवंत, श्रीमंत बायका

जगातील पहिल्या पाच जणांत बसणारा भारतीय दारूविक्रेता, आपल्या मुलाच्या वाढदिवसाला त्याला अख्खी विमानकंपनी भेट देणारा धनवंत, श्रीमंत बायका, नट्या आणि देखण्या तरुणींच्या घोळक्यात सदैव वावरणारा गुलछबू, देशाला व त्याच्या राष्ट्रीयीकृत बँकांना नऊ हजार कोटींनी बुडविणारा खासदार, इंग्लंडमधील वास्तव्यात थेट तेथील राणीच्या महालासमोरील विशाल निवासात वास्तव्य करणारा शौकीन आणि सरकारच्या मदतीने वा त्याचा डोळा चुकवून जेट एअरवेजच्या विमानातून ३६ बॅगा आणि अज्ञात देखणी स्त्री सोबत घेऊन पळालेला चतुर चोर विजय मल्ल्या याला भारत सरकारने उशिरा केलेल्या विनंतीवरून स्कॉटलंड यार्डच्या पोलिसांनी परवा अटक केली. त्या अटकेला अवघे दोन-तीन तास होतात न होताच तोच त्याला जामीन मिळाला आणि आता आपले सरकार परत आणायला जागतिक न्यायालयाचा दरवाजा ठोठावायला निघाले आहे. त्याला अटक झाली तेव्हा ती अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या बुद्धिमत्तेमुळे व वकिलीतील त्यांच्या ज्ञानामुळे झाली, असा गाजावाजा माध्यमांनी केला. मात्र पुढे तो जामिनावर कोणाच्या बुद्धिमत्तेमुळे सुटला हे सांगायला त्यांनी आपली तोंडे उघडली नाहीत. मुळात विजय मल्ल्या हे एक अद्वितीय म्हणावे असे गूढ प्रकरण आहे. मुकेश अंबानी, अदानी आणि गोदरेज यासारख्या उद्योगपतींसोबत वावरलेले ते इसम आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा आणि देशातील इतरही अनेक प्रमुख पक्षांच्या पुढाऱ्यांकडे त्यांचा राबता राहिला आहे. इंग्लंडमध्ये ‘लपून बसला’ असतानाही तो राणीच्या नवऱ्यासोबत टेनिस कोर्टावर दिसायचा. तो ज्या जेट कंपनीच्या विमानातून खासदाराच्या विशेष पारपत्राच्या बळावर देशी यंत्रणांची फसवणूक करून इंग्लंडला पळाला त्या कंपनीचा मालक पूर्वीच्या व आताच्या सरकारच्या अतिशय निकटवर्ती गोटात वावरणारा आहे. असा माणूस सरकारच्या हातावर तुरी देऊन पळतो हीच बाब मुळी संशयास्पद वाटावी अशी आहे. सरकार, जेट कंपनी, परराष्ट्र खाते आणि सुरक्षा यंत्रणा यांचे वा त्यांच्यातील कोणा एकाचे पाठबळ असल्याखेरीज त्याला असे पळता येणे शक्यच नव्हते. नाही म्हणायला त्याच्या आधी ललित मोदी हा देशबुडवा अपराधीही असाच पळाला होता. त्याला परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज आणि राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांचे पाठबळ होते. त्यातल्या वसुंधराबार्इंच्या चिरंजीवांना त्याने कित्येक कोटी रुपये त्याच्या व्यवसायासाठी दिलेही होते. तो पळाल्यानंतर व इंग्लंडात बसून भारताला वाकुल्या दाखवताना दिसल्यानंतरही या दोन महिला त्याचे समर्थन करीतच होत्या. साध्या चोरांवर २४ तास नजर ठेवणाऱ्या आपल्या सुरक्षा यंत्रणा हजारो कोटींची चोरी करणाऱ्या माणसांना राजरोसपणे परदेशात जाऊ देतात, तेव्हा त्या यंत्रणांचे दुबळेपणच त्यातून उघड होते. या चोरांच्या सरकारात बसलेल्या साथीदारांची व सरकारी यंत्रणांची त्यांना असलेली साथही साऱ्यांच्या लक्षात येते. मल्ल्याच्या पश्चात सरकारने त्याची विमाने जप्त केली. घरांना सील लावले. त्याच्या मोटारी ताब्यात घेतल्या. मात्र सरकारातील कोणीही त्याच्या चौर्यकर्मावर उघड बोलले नाही. त्याच्या गुन्हेगारीची चर्चा करावी, असे संसदेला वाटले नाही आणि माध्यमांनाही त्याची चर्चा खुलेपणाने कराविशी वाटली नाही. पैसा मिळवा, तो कोणत्याही मार्गाने मिळवा, त्याचा वापर कशाही शौकावर करा, सरकारातील लोकांचे खिसे भरा, त्यांचा पाहुणचार करा, देश बुडवा आणि विदेशात पळून जाऊन सुरक्षित राहा असा हा मामला आहे. विजय मल्ल्याने दक्षिण आफ्रिकेत हजारो एकर जमिनी विकत घेऊन त्यात शिकारीसह जंगल सफारींची व्यवस्था केली आहे. आताच्या सरकारातले व याआधीच्या सरकारातले किती मंत्री, अधिकारी, पुढारी व राज्यांचे नेते देशातील अनेक बड्या पत्रकारांसह मल्ल्याच्या या सफारींचा व त्यातील पाहुणचाराचा भोग घेऊन आले आहेत, याची माहिती लहानसहान माणसांना व जिल्हा स्तरावरील पत्रकारांनाही आहे. अशा माणसाच्या अवैध संपत्तीचा शोध सरकारला एवढ्या उशिरा का लागावा आणि तो पळून गेल्यानंतर त्याचा माग घेण्याची त्याला बुद्धी का व्हावी हाच खरे तर देशाने सरकारला विचारायचा प्रश्न आहे. सरकारला जुळलेली चोर माणसे पकडली जातील आणि लगेच सुटतीलही. त्यांना पकडल्याचे श्रेय सरकार घेईल आणि ती सुटल्याचे श्रेय ती माणसे आपल्या चतुराईला देतील. तात्पर्य, मल्ल्याचे प्रकरण हा शासकीय बनवाबनवीचा खेळ आहे. यात केवळ राजकारणातलेच पुढारी सामील नाहीत. त्यात उद्योगपती आहेत, कारखानदार आहेत, विमान कंपन्यांचे मालक आहेत, माध्यमांचे संचालक आहेत आणि हो, देशभरचे आणि विदेशातले बडे दारूविक्रेतेही त्यात आहेत. एवढ्या मोठ्या रॅकेटला दोन तास पकडून ठेवणेच तेवढे जमते. पुढे त्यासाठी न्यायालयीन नाटके चालविली जातात आणि ती कितीही काळ चालू शकतात. हे थांबत नाही आणि मल्ल्याच्या मुसक्या आवळून त्याला देशी न्यायालयासमोरील आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले जात नाही, तोवर आताच्या ‘अटक व जामीन’ या नाटकावर कोण कसा विश्वास ठेवील? त्याचवेळी त्याला साथ देणारे जोवर मोकळे राहतील तोवर सरकारचा भरवसा तरी कोणाला वाटेल?