दोंडाईचा : दोंडाईचा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तापी नदीत पुरेसा जलसाठा व नगरपालिकेकडे पाणीपुरवठ्याची अद्ययावत सामुग्री असूनही जलवाहिनीचा किरकोळ दुरुस्ती अभावी दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्यास अडचण होती. परंतु दोंडाईचा नगरपालिकेने दहा वर्षांपासून धूळ खात पडलेली जलवाहिनी युद्धपातळीवर दुरुस्त केल्याने आता दोंडाईचा शहराला नियमित दोन दिवसाआड पाणी पुरवठा करणे शक्य झाल्याचे प्रतिपादन माजी मंत्री तथा आमदार जयकुमार रावल यांनी दाऊळ येथील जलवाहिणीचे लोकार्पण करतांना केले.दोंडाईचा शहराला तापी नदीतून पाणीपुरवठा होतो. तावखेडा तापीनदीतुन पाणी इन्टेक वेल व जँकवेलद्वारे दोन स्वंतत्र जलवाहिन्यामार्फत दाऊळ जलशुद्धीकरण केंद्रात आणले जाते. जलशुद्धीकरण केंद्रात पाण्यावर प्रक्रिया होऊन शुद्ध केले जाते. परंतु तेथून फक्त एका जलवाहिनीमार्फत दोंडाईचा येथील जलकुंभात पाणी टाकले जात होते. त्यामुळे तापी नदीत भरपूर पाणी असूनही दोन दिवसाआड पाणी पुरवठा करण्यास अडचण होती. पाणीपुरवठा बाबत असलेली अडचण आमदार जयकुमार रावल व नगराध्यक्षा नयनकुवर रावल यांचा लक्षात आल्यानंतर युद्धपातळीवर जलवाहिनी दुरुस्तीचे आदेश देण्यात आलेत. सदर जलवाहिनी जागोजागी खंडीत झाली होती. बरेचसे एअर व्हॉल्व चोरीस गेले होते. जलवाहिनीच्या सपोर्टसाठी असणारे चेअर दुरुस्त करण्यात आल्यात.सदर दुरुस्तीचे काम नगराध्यक्षा नयनकुवर रावल, मुख्याधिकारी डॉ़ दीपक सावंत, पाणीपुरवठा सभापती वैशाली महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली काम लॉकडाऊन काळात युद्धपातळीवर करण्यात आले. जलवाहिनी दुरूस्त केल्याने शहराला आता दोन दिवसाआड पाणीपुरवठा करणे शक्य झाले असून नवीन पाणीपुरवठा योजना दीपावलीपर्यंत पूर्ण होऊन शहराला नियमित एकदिवसाआड पाणी पुरवठा केला जाईल, असे प्रतिपादन आमदार जयकुमार रावल यांनी केले.कार्यक्रमात मुख्याधिकारी डॉ दीपक सावंत, रविंद्र उपाध्ये, प्रविण महाजन, निखिल जाधव, जितेंद्र गिरासे, राजेश जाधव, भरतरी ठाकूर, चिरंजीवी चौधरी, कृष्णा नगराळे, संजय तावडे, हितेंद्र महाले, किशन दोधेजा, नरेंद्र गिरासे, रविंद्र जाधव, इरफान पिंजारी, गिरीधारी रुपचंदानी, डॉ़ मुकुंद सोहनी, राजेश मुणोत आदी उपस्थित होते़
दोंडाईचा शहराला दोन दिवसाआड पाणीपुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2020 22:24 IST