कोरोनाची दुसरी लाट आलेली आहे. संकट खूप मोठे आहे. सध्या पहिल्या लाटेपेक्षा कोरोना व्हायरस हा दहा पटीने पसरत असल्यामुळे सर्वदूर कोरोनाचा हाहाकार माजला आहे. गावात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मृत्यूचेही प्रमाण वाढत आहे. गावातील जि.प. व खासगी शाळेतील शिक्षक व आशा सेविका गावात कोरोनाबाधितांचा सर्व्हे करीत आहेत. मात्र नागरिक खरी माहिती लपवित आहे. ग्रामपंचायत सदस्य आपापल्या वॉर्डांत त्यांच्या सोबत राहिले तर ही मोहीम अधिक परिमाणकारक होईल.
जनतेच्या मनात लसीकरणाबाबत गैरसमज मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. लस दिल्यानंतर कोरोना होतो. ताप ,अंगदुखी, अशक्तपणा येतो. मृत्यू येतो. अशा गैरसमजातून जनतेच्या मनात भीती वाढत असल्याने लसीकरणाबाबत उदासीनता दिसून येत आहे. ज्या दिवशी लस असते त्या दिवशी अनेक जण भीतीने शेतातील झाडाखाली जाऊन बसतात . याउलट शहरातील लसीकरण केंद्रात लसीकरणासाठी गर्दी दिसून येते. केंद्रात लसींचा तुटवडा असल्यामुळे पहिला व दुसरा डोस घेणाऱ्यांची फरफट होत आहे. मात्र गावातील मजूरवर्ग नागरिकांनी गावातल्या आरोग्य केंद्राकडे पाठ फिरवली असल्याचे दिसून येते.
सध्या कोरोनावर औषध उपलब्ध नाही. लसही आपल्यासाठी संजीवनी आहे. लस व शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. अशी जनजागृती माजी उपसरपंच प्रतापराव माळी करीत आहेत.
कोरोना संकटकाळात गावातील नागरिकांची जबाबदारी सरपंच, सर्व सदस्य व ग्राम दक्षता समितीची असली तरी प्रशासकीय यंत्रणा, ग्रामसेवक, तलाठी, पोलीसपाटील, गटविकासाधिकारी, वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, शिक्षक, तरुण सामाजिक कार्यकर्ते यांच्याशी एकत्रित संवाद साधून योग्य नियोजन व अंमलबजावणी केल्यास व लसीबाबत गैरसमज दूर केल्यास कोरोना वर मात करता येईल.
या महिन्यात नियमित लसीकरण सुरू आहे . केंद्रावर गर्दी न करता नियम पाळून लसीकरण सुरू आहे. सुमारे ४०० लोकांनी लस घेतली असून, कोणालाही त्रास झाला नसल्याचे परिचारिका दीपाली मैत्रे यांनी सांगितले.
फोटो : फोन करून प्रोत्साहन दिल्यावर लसीकरणासाठी आलेले ग्रामस्थ.