दोंडाईचा : सुरत - भुसावळ या रेल्वे मार्गावर मुंबईत बांद्रा येथे जाणारी खान्देश एक्सप्रेस ही नवीन गाडी शनिवारपासून सुरु होणार आहे. या गाडीमुळे शिंदखेडा तालुक्यातील लोकांना थेट मुंबईला जात येणार आहे.भुसावळ हुन जळगांव, अमळनेर, बेटावद , नरडाणा , शिंदखेडा, दोंडाईचा या स्थानका वरून मुंबईत जाण्यासाठी एक गाडी सुरू करावी अशी मागणी होती. त्यानुसार ही एक्सप्रेस गाडी सुरु करण्यात आली आहे. याशिवाय उधना-नंदुरबार व उधना-जळगांव अशा २ नविन रेल्वेही सुरु करण्यात आल्या आहे. त्यासुद्धा शनिवारपासून धावणार आहे.खान्देश एक्सप्रेस रविवार, मंगळवार व गुरुवारी सायंकाळी ५.४० वाजता भुसावळ येथून निघेल. जळगांव, धरणगाव, अमळनेर, नरडाणा, शिंदखेडा येथे थांबत दोंडाईचा स्थानकात रात्री ८.४५ वाजता पोहचणार आहे. तेथून नंदुरबार, नवापूर, बारडोली, नवसारी, बलसाड, पालघर, विरार, बोरीवलीमार्गे बांद्रा टर्मिनस (मुंबई) येथे सकाळी पाच वाजता पोहचेल. तसेच बांद्रा टर्मिनस (मुंबई )हून गाडी दर शनीवारी, सोमवारी व बुधवारी रात्री ११.५० वाजता सुटेल व दोंडाईचा येथे सकाळी ८.३० वाजता पोहचेल. प्रवाशांच्या सोयीसाठी खान्देश एक्सप्रेसमध्ये सहा जनरल कोच, चार स्लिपर कोच, दोन ए सी थ्री टायर, एक ए सी फर्स्ट क्लास व गार्ड तसेच पार्सलसाठी २ कोचेस याप्रमाणे एकुण १५ कोचेसची ही गाडी आठवड्यातून तीनदा ये-जा करेल तरी सदर गाडीचे आरक्षण करुन दोंडाईचा रेल्वे स्थानकाच्या उत्पन्नात अधिकाधिक भर घालून लाभ घ्यावा असे आवाहन दोंडाईचा प्रवाशी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.
खान्देश एक्सप्रेस मुंबईसाठी शनिवारपासून धावणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2019 21:50 IST