उस्मानाबाद : कोरोनाच्या संकटकाळात रुग्णांसाठी डॉक्टरांनी अविरत सेवा बजावली. मात्र गेल्या काही दिवसांपासून रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांकडून डॉक्टरांवर मोठ्या प्रमाणावर हल्ले होत आहेत. त्यामुळे डॉक्टरांचे मनोबल खचले आहे. शासनाने हल्ले तत्काळ थांबवावेत. हल्लेखोरांविरुद्ध कायद्याची कडक अंमलबजावणी करावी, यासह विविध मागण्यांसाठी इंडियन मेडिकल असोसिएशन उस्मानाबाद शाखेच्या वतीने शुक्रवारी काळ्या फिती बांधून सेवा बजावली.
कोरोना काळात जीवाची बाजी लावून रुग्णसेवा बजावत असलेल्या डॉक्टरांवर देशाच्या कानाकोपऱ्यात हल्ले होत आहेत. त्या विरोधात इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीने शुक्रवारी काळ्या फिती बांधून सेवा बजाविली. यावेळी डॉक्टरांनी सांगितले की, केंद्र सरकारने आरोग्य सेवक रक्षक कायदा केला तो कायदा अंमलात आणण्यात यावा, डॉक्टरांवर झालेल्या हल्ल्याच्या केसेस फास्टट्रॅक कोर्टात चालविण्यात याव्यात, हल्लेखोरांना अजामिनपात्र गुन्हा दाखल करण्यात यावा, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत. विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. यावेळी इंडियन मेडिकल असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष डॉ.सचिन देशमुख, सचिव डॉ. मिलिंद पौळ, डॉ. नितीन भोसले, डॉ. रणजित कदम, डॉ. एन.बी. गोसावी, डॉ. सतीश आदटराव, डॉ. रवींद्र पापडे, डॉ. विशाल वडगावकर, डॉ. कुलदीप सस्ते आदींची उपस्थिती होती.
तसेच विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.