जवळा (नि.) : परंडा तालुक्यातील मौजे राजुरी येथे शासनाने लाखो रुपये खर्च करुन तयार केलेल्या जमीन गट नं. १९० मधील पाझर तलावाचा भराव फोडून जमिनीला तारेचे कंपाऊंड करुन वहिताखाली घेऊन अतिक्रमण करण्यात आले आहे. त्यामुळे या प्रकरणी संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे, राजुरी येथील जमीन गट नंबर १९० मध्ये शासनाने आजूबाजूच्या शेतकऱ्यांच्या विहिरी व बोअरला पाणी वाढावे व त्या शिवारातील शेती ओलिताखाली यावी तसेच पाझर तलावाचा परिसरातील शेतकऱ्यांना फायदा व्हावा यासाठी लाखो रुपये खर्च करुन पाझर तलाव बांधण्यात आला.
परंतु, काही शेतकऱ्यांनी हा पाझर तलाव ट्रॅक्टरच्या सहाय्याने फोडून सपाट करुन सदर तलावाची शासनाची जमीन वहीत करुन घेतली. शिवाय, त्याला तारेचे कंपाऊंड करुन त्यात वास्तव्य करत अतिक्रमण केले आहे. सदर पाझर तलाव फोडलेला असल्यामुळे जास्त प्रमाणात पाऊस झाल्यास पाझर तलावाच्या आजूबाजूच्या शेतकऱ्यांच्या शेतातील माती वाहून जाऊन शेती पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन जीवित हानी सुध्दा होऊ शकते. त्यामुळे याकडे गांभीर्याने लक्ष देऊन कारवाईची मागणी शेतकऱ्यांनी निवेदनात केली आहे.
यावर रामदास जगदाळे,प्रदीप गंभीरे, भागवत गंभीरे, सूरज गंभीरे, भास्कर गंभीरे, धिरज गंभीरे, संदीप कांबळे, तुळशीराम कांबळे, शिवाजी कांबळे, वसंत गंभीरे, बाळासाहेब गंभीरे, सचिन गंभीरे, संभाजी गंभीरे, सतीश लटके, संतोष लटके, नवनाथ लटके, रमेश लटके, शरद लटके, जयदेव लटके, बापू लटके, सतीश गंभीरे, विष्णू जगदाळे, दीपक जगदाळे, दशरथ जगदाळे, महानंदा जगदाळे यांच्या सह्या आहेत.
कोट...........
आमच्याकडे शेतकऱ्यांच्या तक्रारी निवेदन व परंडा तहसीलदारांकडून कार्यवाहीस्तव पत्र प्राप्त झाले आहे. तसेच अतिक्रमण केले असल्याचे देखील समजले आहे. परंतु, मी शासकीय कामासाठी औरंगाबादला आल्याने तिकडे जाऊ शकलो नाही. १९ जून रोजी राजुरीतील फोडलेल्या पाझर तलावाचा पंचनामा करणार असून, पाझर तलावाचा भराव फोडणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यासाठी पोलीस स्टेशनला कळवणार आहे.
- प्रभाकर महामुनी, जलसंधारण अधिकारी, परांडा