मठपिंपळगाव : जालना-अंबड मार्गावर शुक्रवारी झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात एकजण ठार तर दोघेजण गंभीर जखमी झाले. या अपघातात एक चार वर्षीय बालक सुखरूप बचावला. विशेष म्हणजे या दोन्ही घटना वेगवेगळ्या ठिकाणी एक तासाच्या अंतराने घडल्या. दुपारी १२.३० वाजता जालन्याहून अंबडकडे जाणाऱ्या संत्रीने भरलेल्या ट्रकने (एम.एच.४०/३५३१) एका पुलाजवळ मोटारसायकलला जोराची धडक दिली. यात मोटारसायकल वरील दोघे पती-पत्नी गंभीर जखमी झाले. तर त्यांचा चार वर्षीय बालक सुखरूप बचावला. या अपघातातील जखमींची नावे मात्र कळू शकली नाहीत. अपघातानंतर ट्रक चालकाने वाहन जागेवर सोडून पलायन केले. या घटनेच्या एक तासाच्या अंतराने दुपारी दीड वाजता शेगाव- बारामती एस.टी. बसने एम.एच.२१/ए.जे. २४८४ या क्रमांकाच्या मोटारसायकलला जोराची धडक दिली. दुचाकीस्वार जालिंदर करडे (वय ४०, रा. काजळा, ता. जालना) हा इसम बसच्या चाकाखाली सापडून जागीच ठार झाला. या घटनेत अपघातानंतर बस चालकाने पलायन केले. याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली. दरम्यान, या दोन्ही घटनांमुळे जालना-अंबड मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी येऊन वाहतूक सुरळीत केली. या घटनेतील जखमींना उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. (वार्ताहर)४ वडीगोद्री-भोकरदन रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम विधानसभा निवडणुकीपूर्वी सुरू झाले होते. मात्र हे काम गतीने व्हावी, अशी अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त करण्यात येत आहे. हा रस्ता अत्यंत अरूंद असल्याने त्याचे काम व्हावे, अशी मागणी गेल्या अनेक दिवसांपासून नागरिकांमधून होत होती. सा.बां. विभागाने यासंदर्भातील प्रस्ताव पाठवून त्यास मंजुरीही मिळाली. परंतु काम संथ गतीने होत असल्याने त्याची गती वाढवावी, अशी मागणीही करण्यात येत आहे.