लातूर : लातूर जिल्ह्यातील पाणीटंचाईचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. जिल्हा प्रशासनाकडून पर्यायी उपाययोजना करण्याचे काम सुरू असले, तरी दिवसेंदिवस टँकर व अधिग्रहणांची संख्या वाढत आहे. लातूर जिल्ह्यातील १० तालुक्याला ११४१ अधिग्रहणे व २४० टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. यासाठी शासनाकडून आलेला निधी अपुरा पडत असल्याने आणखी २ कोटी ६९ लाख ९७ हजार रुपयांच्या निधीसाठी शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे.लातूर जिल्ह्यातील पाणीटंचाईचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. त्यामुळे काही गावांतील नागरिकांना पाणीटंचाईच्या झळा सहन कराव्या लागत आहेत. या वाढत्या टंचाईपासून नागरिकांना दिलासा मिळावा, यासाठी ७३१ गावांत ११४१ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. तर १८१ गावे आणि ४१ वाड्या अशा एकूण २२२ ठिकाणी २४० टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. लातूर तालुक्यातील २९ गावे व एका वाडीवर ४० टँकरद्वारे १०९ गावांमध्ये १८२ विहिरींचे अधिग्रहण करून पाणीपुरवठा करण्यात येत आहे. औसा तालुक्यातील २० गावे आणि दोन वाड्यांवर २३ टँकरद्वारे आणि ११५ गावांमध्ये १६५ विहिरी अधिग्रहित करून पाणीपुरवठा सुरू केला आहे. रेणापूर तालुक्यातील १५ गावे आणि ४ वाड्यांवर २० टँकरद्वारे आणि ६७ गावांमध्ये ९६ विहिरींचे अधिग्रहण करून पाणी दिले जात आहे. उदगीरमधील २६ गावे आणि १४ वाड्यांवर ३८ टँकर आणि ७४ गावांकरिता १११ विहिरी, अहमदपूर तालुक्यातील २९ गावे व ८ वाड्यांवर ४२ टँकर तर १०२ गावांकरिता १३७ विहिरी, चाकूर तालुक्यातील १९ गावांत २३ टँकर आणि ७० गावांकरिता ९५ विहिरी, देवणी तालुक्यातील १२ गावे आणि तीन वाड्यांवर १२ टँकरद्वारे आणि ३६ गावांमध्ये ५७ विहिरी, जळकोटमधील १४ गावे व ७ वाड्यांवर २० टँकर तर ३७ गावांत ५१ विहिरी, निलंग्यातील १२ गावे आणि दोन वाड्यांमध्ये १७ टँकर आणि ९७ गावांकरिता २११ विहिरी, शिरूर अनंतपाळ तालुक्यातील ५ गावांमध्ये ५ टँकर आणि २४ गावांमध्ये ३७ विहिरींचे अधिग्रहण करून पाणीपुरवठा करण्यात येत आहे. दिवसेंदिवस पाण्याची टंचाई वाढत असल्यामुळे या वाढत्या टंचाईवर उपाययोजना करण्यासाठी टँकर व अधिग्रहणाची संख्या वाढवावी लागत आहे. यासाठी पुरेसा निधी उपलब्ध व्हावा, यासाठी प्रलंबित २ कोटी ६९ लाख रुपयांचा निधी मिळविण्यासाठी जिल्हा प्रशासनाची धावपळ सुरू आहे. (प्रतिनिधी)
अधिग्रहणांची अडीच कोटींची देयके थकली
By admin | Updated: April 8, 2016 00:27 IST