तेर : उस्मानाबाद तालुक्यातील तेर पासून जवळच असलेल्या मध्यम प्रकल्पातून तेर, ढोकी तडवळा, येडशी या गावांना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातून चार दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत आहे. तर कावळेवाडी, बुकनवाडी, पळसप या गावांना शुद्धीकरण केंद्रावरुन टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे.तेरणा माध्यमिक प्रकल्पात केवळ मृतसाठा असून, हे पाणी मोठ्या प्रमाणात गाळयुक्त असून, ते शुद्धीकरण केंद्रात व्यवस्थितरित्या शुद्धीकरण होत नसल्यामुळे मागील अनेक दिवसांपासून या सर्व गावांना अशुद्ध पाणीच प्यावे लागत आहे. त्यामुळे या सर्व गावातील हजारो नागरिकांना अशुद्ध पाण्यामुळे रोगराईचे संकट कोसळल्याने नागरिकांत तीव्र संताप व्यक्त होत आहे. सध्या पाणी टंचाईच्या झळा मोठ्या प्रमाणात जिल्ह्याला भेडसावत असतानाच त्यातच तेर, ढोकी, तडवळा, येडशी, या गावांना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातून दूषित पाणी पुरवठा होत आहे. परंतु येथील लोकांना नाईलाजास्तव दुषित पाण्याचा आधार घ्यावा लागत आहे. पाणी पूर्णत: दुषित पिल्यामुळे विविध आजारांची लागण होऊ शकते. त्यामुळे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने वेळीच लक्ष देऊन शुद्ध पाण्याचा पुरवठा करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.सध्या धरणात मृतसाठा शिल्लक असून, गाळमिश्रीत पाणी असल्यामुळे व्यवस्थित शुद्ध पाणी होत नाही. शुद्ध करुनच पाणी पुरवठा करण्याची सूचना कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या असल्याचे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे उपअभियंता रमेश ढवळे यांनी सांगितले. (वार्ताहर)
तेरला गाळयुक्त पाणी पुरवठा
By admin | Updated: April 22, 2015 00:39 IST