जालना : शहरात संवेदनशील भागात असलेल्या सदर बाजार पोलिस ठाण्यातील जवळपास कर्मचाऱ्यांची बदली झाली. जुने केवळ २० कर्मचारी राहिले आहेत. बदली झालेले सर्वच कर्मचारी नवीन ठिकाणी रूजू झाले. मात्र या ठाण्यात रूजू होण्यासाठी अजूनही कर्मचारी आले नाहीत. त्यामुळे सद्यस्थितीत या ठाण्याचा कारभार केवळ २० कर्मचाऱ्यांवर सुरू आहे. जाणकार सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सदर बाजार पोलिस ठाण्यात सर्वाधिक लोकसंख्या असलेला परिसर आहे. त्यामुळे या ठाण्यातील कर्मचाऱ्यांवर बंदोबस्त, गस्तीचा मोठा ताण असतो. सध्या सण व उत्सावाचे दिवस आहेत. शहर वाहतूक शाखेचे कर्मचारी त्यासाठी मदतीला घेतले जात आहेत. त्यामुळे वाहतूक व्यवस्था विस्कळीत होत आहे. सदर बाजार ठाण्यातून एकाचवेळी सर्वच कर्मचारी सोडण्यात आले आहेत. नवीन कर्मचारी रूजू झाल्यानंतर कार्यरत कर्मचारी सोडणे गरजेचे होते. बदली होऊन एकाच कर्मचाऱ्याला सोडण्यात आले नाही. येत्या आठ दिवसात ठाण्याला कर्मचारी वर्ग दिला जाणार असल्याचे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले. जिल्ह्यात तात्काळ बदलीची प्रक्रीया राबविली जाणार आहे. दरम्यान, सदर बाजार पोलिस ठाण्यात अगोदरच कर्मचारी संख्या कमी आहे. संवेदनशील ठाणे म्हणून येथील कर्मचाऱ्यांची संख्या वाढविणे गरजेचे असल्याचे काही जाणकार सूत्रांनी सांगितले. (प्रतिनिधी)
२० पोलिसांवरच ठाण्याचा कारभार
By admin | Updated: July 19, 2014 00:44 IST