जालना : गेल्या चार सहा दिवसांपासून पडलेल्या संततधार व दमदार पाऊस जिल्ह्यातील खरीप पिकांना पोषक ठरला आहे. या जिल्ह्यात अपुऱ्या पावसाअभावी खरीप पिके धोक्यात होती. विशेषत: ही पिके करपण्याच्या अवस्थेत पोहचली. त्यामुळेच सर्वदूर या पिकांसाठी पाऊस गरजेचा होता. मात्र वातावरणात कोणताही बदल जाणवत नव्हता. अक्षरश: उन्हाळ्यासारखे ऊन पडत होते. त्यामुळे शेतकरी चिंतेत होता. गेल्या दोन वर्षांपासून नैसर्गिक आपत्तीचा तडाखा बसलेल्या शेतकऱ्यांना याही वर्षी मोठा फटका बसला तर करावे तरी काय, असा प्रश्न पडला होता. मात्र पोळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात सर्वदूर पाऊस सक्रिय झाला. या आठवड्यात सर्वदूर संततधार व दमदार असा झाला. भोकरदन भागात दोन अडीच दिवस मुसळधार पाऊस झाला. परतूर व जालना तालुक्यात भागातही चांगला पाऊस झाला. तो पाऊस खरीप पिकांसाठी पोषक असा ठरला आहे. या पावसाने खरिपातील कपशीसह खुंटलेल्या सोयाबीनच्या वाढीस मदत होणार आहे. तर पिकांवरील रोगराईवरसुद्धा अळा बसणार आहे. काही शेतकऱ्यांनी ठिबकवर घेतलेल्या कपाशीला हा पाऊस खूपच पोषक ठरला आहे. ठिबकवरील कपाशीला फुलोरा व बोंडे लागली आहेत. तर वाढही गुडघ्याएवढी आहे. त्यामुळेच शेतकरी कमालीचे सुखावले आहेत. घनसावंगी व अंबड या भागात हा पाऊस फळउत्पादकांना दिलासा देणारा ठरला आहे. जिल्ह्यात या आठवड्यात पडलेल्या पावसाने बळीराजाचा पोळासण उत्साहात साजरा झाला.आता गणेशोत्सवही आनंदात साजरा होतो आहे. पावसाने सर्वसामान्य शेतकऱ्यांचे चेहरे उजळले आहेत. (वार्ताहर)नळणी : नळणीसह परिसरात सलग तीन दिवसांपासून दमदार पाऊस सुरु असल्यामुळे पिकांना नवसंजीवनी मिळाली आहे. दमदार पावसामुळे कपाशी, तूर, सोयाबीन, ऊस आदी पिकांच्या उत्पन्नात वाढ होणार असल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.४शेतकऱ्यांनी पिकांची लागवड केल्यानंतर पिकांची वाढ झाली. मात्र अचानक पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांचा जीव भांड्यात पडला होता. अगोदरच शेतकऱ्यांना दुबार, तिबार पेरणी करावी लागली. त्यातच शेतकऱ्यांचे आर्थिक कंबरडे मोडले. परंतु अचानक पावसाने दडी मारल्याने शेतातील मका, कपाशी या पिकांनी माना टाकण्यास सुुरुवात केली. मात्र वरुणराजा काही बरसत नव्हता. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उरल्या-सुरल्या आशा संपुष्टात आल्या होत्या. पावसाने दडी मारल्याने कपाशी, मका, सोयाबीन पिक धोक्यात आले होते. शेतकऱ्यांचा महत्वाचा असणारा पोळा या सणावरही दुष्काळाचे सावट निर्माण झाले होते. पोळा सणाच्या एक दिवस अगोदरच पावसाची सुरुवात झाल्यामुळे पिकांना नवसंजीवनी मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंद निर्माण झाला.मंठा : तालुक्यात सर्वदूर पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी वर्गात आनंदी आणि चैतन्याचे वातावरण असून पोळा सणाच्या दिवशीच पाऊस पडल्याने सर्वांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.४मंठा, हेलस, गेवराई, तळतोंडी, मेरखेडा, रामतीर्थ, तळणी, जयपूर, पांगरी गोसावी, खोराड सावंगी, नळडोह आदी परिसरात पावसाने हजेरी लावली. कपाशी पिकाला यामुळे मोठे फायदा होणार असून सोयाबीन, मुग या पिकांना मात्र पाऊस पडल्याने काहीअंशी फायदा होणार असला तरी मध्यंतरी पावसाने दडी मारल्याने हलक्या जमीनीचे सोयाबीन, मुग वाया गेले असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. तुलनेत मुग, सोयाबीनचे उत्पन्न निम्म्यापेक्षाही घसरणार असल्याचे चित्र आहे.४जूनपासून पाऊस अत्यल्प असल्याने विहिरींची पाणी पातळी खालावली असून नद्या, ओढे, कोरडे पडले आहेत. कूपनलिकेचेही पाणी झपाट्याने आटत असताना या पडलेल्या पावसामुळे मात्र सर्वांनाच दिलासा मिळाला आहे.
दमदार पावसाने खरीप पिकांना मिळाले जीवदान
By admin | Updated: August 31, 2014 01:08 IST