जालना : केंद्र व राज्य सरकारने अनेक जनहित विरोधी निर्णय घेतल्याचा निषेध करून सरकारच्या विरोधात जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने सोमवारी येथील अंबड चौफुली भागात पाऊणतास रास्ता रोको करण्यात आला.दुपारी १२ वाजेपासूनच काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते अंबड चौफुली परिसरात एकत्र येऊ लागले होते. कार्यकर्त्यांची गर्दी आणि तेथे बंदोबस्तासाठी आलेले पोलिस यामुळे वाहतूक संथ झाली होती. १ वाजेच्या सुमारास आंदोलनास प्रारंभ झाल्याने ही वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी माजी आमदार कैलास गोरंट्याल, जिल्हाध्यक्ष भीमराव डोंगरे, नगराध्यक्षा पार्वताबाई रत्नपारखे, महिला जिल्हाध्यक्षा विमलताई आगलावे, शहराध्यक्ष अब्दूल हाफिज, अल्पसंख्यांक सेलचे जिल्हाध्यक्ष बदर चाऊस, सेवादलाचे जिल्हाध्यक्ष प्रशांत वाढेकर, सुभाष काटकर, वसंत डोंगरे, विष्णूपंत कंटूले, बद्रीनारायण ढवळे, संदीप कड, संदीप गोरे, सुरेश तळेकर, एकबाल कुरैशी, अंकुश राऊत, राम सावंत, मोहन इंगळे आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती. नैसर्गिक संकटांनी शेतकरी उद्ध्वस्थ झालेला असतानाही केंद्र व राज्य सरकारने शेतकऱ्यांना भरीव मदत दिली नाही.हेक्टरी ४५०० रुपये जाहीर करतानाही २ हेक्टरपर्यंत मर्यादा घालून व त्यापेक्षा नाममात्र अधिक शेती असणाऱ्यांना केवळ एक हेक्टरपर्यंत मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला. तो त्वरीत रद्द करून शेतकऱ्यांच्या एकूण शेतजमिनीचा विचार व्हावा अशी मागणी करण्यात आली. भाजपा-सेनेने निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ, असे आश्वासन दिले होते. परंतु सत्तेवर आल्यावर त्यांनी शेतकऱ्यांचा विश्वासघात केला, असा आरोपही यावेळी करण्यात आला. घरगुती वीज, छोटे उद्योग, पॉवरलूम यांच्या वीज बिलात काँग्रेस सरकारने २० टक्के सवलत दिली होती. यासाठी काँगे्रस सरकारने कोट्यवधी रुपयांचे अनुदान दिले होते. मात्र भाजपा-सेना युती सरकारने वीज बिलाचा भूर्दंड देऊन कामगारांवर आर्थिक बोजा लादला असाही आरोप करण्यात आला. आंदोलनात पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.याबाबत आंदोलकांच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन पाठविण्यात आले असून जनहित विरोधी निर्णय रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)
काँग्रेस कार्यकर्त्यांचा पाऊणतास रास्ता रोको
By admin | Updated: February 10, 2015 00:29 IST