संतोष धारासूरकर , जालनाजालना जिल्हा निर्मितीसंबंधी दिलेल्या शब्दाची अवघ्या वर्षभरात परिपूर्ती करणारे कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी मुख्यमंत्री अब्दुल रहेमान अंतुले यांच्या निधनाच्या वृत्ताने जिल्हावासीयांना मोठा धक्का बसला अन् त्यांच्या स्मृतीही जाग्या झाल्या....२४ जानेवारी १९८१ ची गोष्ट. नवीन जालन्यातील सिंधी बाजारात तत्कालीन मुख्यमंत्री ए. आर. अंतुले यांची सभा होती. रात्री ९.३२ मिनिटांनी ते या सभेस भाषणासाठी उभे राहिले. अन् अनेक विषयासंबंधी परखडपणे मत व्यक्त करताना अंतुले यांनी अचानक जालन्यास जिल्ह्याचा दर्जा बहाल करु, अशी घोषणा केली. त्यांच्या या ठोस घोषणेने व्यासपीठावरील माजी खासदार स्व. बाळासाहेब पवार, माजी आ. बाबुसेठ दायमा, माजी आ. शकुंतला शर्मा, रिपब्लिकन पक्षाचे नेते बाबूलाल पंडित, माजी नगराध्यक्ष रमेशचंद्र चौविशा, ज्येष्ठ सामाजिक नेते मनोहरराव जळगावकर, माजी आ. मोहनलाल गोलेच्छा व कॉँग्रेसचे नेते सुखलाल कुंकूलोळ यांच्यासह अन्य आवाक्च झाले. श्रोत्यातून लगेच टाळ्यांचा कडकडाट झाला. त्याक्षणी अंतुले यांनी व्यासपीठावरील पुढाऱ्यांकडे कटाक्ष टाकून ‘आपने जो कुछ सूना है, वह बिल्कुल सही है, मैने यही कहाँ है की, आपका जालना शहर कुछही दिनो के बात तहसील न रहकर जिल्हा बनने जा रहा है, महाराष्ट्र राज्य का मुख्यमंत्री होने के नाते मेरी औरसे जालना के निवासीओंको नये वर्ष की सहस्त्र भेट होगी’ असे ते म्हणाले.खुद्द मुख्यमंत्र्यांच्या या घोषणेने व्यासपीठावरील पुढाऱ्यांसह श्रोते सुखावले. अंतुले यांनी त्या सभेतून दिलेल्या त्या शब्दाची पूर्तताही अवघ्या काही महिन्यांतच केली. अन् जिल्हा निर्मितीचे ते शिल्पकार ठरले. जालना जिल्हा निर्मितीत अन्यप्रमाणे अंतुले यांचेही हे योगदान अतुलनीय ठरले. औरंगाबाद जिल्ह्याचे विभाजन व्हावे व त्यातून जालना जिल्हा निर्मिती व्हावी, अशी या जिल्ह्यातील तत्कालीन काही राजकीय व सामाजिक क्षेत्रातील पुढारी व कार्यकर्ते अपेक्षा बाळगून होते.स्व. बाळासाहेब पवार व स्व. बाबूसेठ दायमा, मनोहरराव जळगावकर, शेषराव पाटील, विश्वनाथराव खेरुडकर, शशीकांत पटवारी, रज्जाक तालीब, विश्वासराव भवर, राधाकिसन ताल्ला यांच्यासह अन्य नेतृत्वाने जिल्हा निर्मितीसाठी सरकार दरबारी मोठा पाठपुरावा केला होता. जिल्हा निर्मितीच्या चळवळीत योगदान दिलेल्या त्या श्रेष्ठांना अंतुले यांनी शब्दरुपाने दिलेल्या आश्वासनाची पूर्तता झाल्यानंतर १ मे १९८१ साली जालना जिल्हा अस्तित्वात आला. आणि जालनेकरांच्या स्वप्नाची पूर्तता झाली. ४विकास समितीचे सचिव बाबूलाल पंडित यांनी सांगितले, जालना विकास समितीच्या माध्यमातून जिल्हा निर्मितीची मागणी जन्माला आली. या मागणीला खरे बळ दिले ते बॅ. अंतुले यांनीच. दिलेला शब्द खरा करून दाखविण्याची कुवत त्यांच्यातच होती, अशी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. अॅड.अंकुशराव टोपे म्हणाले, आपण आमदार व खासदार या नात्याने बॅ. अंतुले यांच्या सहवासात आलो. धाडसी, कर्तृत्वान आणि दिलदार असलेल्या या माणसाने जालन्यावर जिवापाड प्रेम केले. त्यांना जालना हा आपला जिल्हा वाटत होता. ४जिल्हा निर्मितीच्या दिवशीच मुख्यमंत्री अंतुले यांचे शहरात आगमन झाल्याबरोबर त्यांचे जालनेकरांनी जोरदार स्वागत केले. काढलेल्या शोभायात्रेतून पुष्पवृष्टी केली. त्यावेळी झालेल्या सभेत अंतुले यांनी ‘मै यह जिल्हे का निर्माता हुं, मैने जालना जिल्हे को जन्म दिया है, मैही इसका पालकमंत्री रहुंगा, इस जिल्हे का पालन-पोषण और विकास करना मेरा जिम्मा होगा’ असे म्हटले.
जिल्हा निर्मितीचा शिल्पकार काळ्याच्या पडद्याआड
By admin | Updated: December 3, 2014 01:15 IST