तुळजापूर : तुळजाभवानी मंदिर संस्थानतर्फे चालविण्यात येणाऱ्या तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या संलग्नीकरणाकरिता प्रतिवर्षी एआयसीईटीचे रिन्यूअल शुल्क भरणे गरजेचे असते. परंतु यंदा दोन वेळा फी भरण्याची वाढीव मुदत मिळूनही फी भरली गेली नाही. यामुळे सदर महाविद्यालय बंद पडण्याच्या मार्गावर असल्याचे सांगत, याकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी अभियांत्रिकी महाविद्यालय बचाव समितीच्या वतीने तुळजापूर बेमुदत बंद पुकारण्यात आला. याला बुधवारी शहरवासीयांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला.सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांसह शहरातील व्यापारी, पुजारी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची बुधवारी येथील पुजारी मंडळाच्या सभागृहात बैठक झाली. महाविद्यालय संलग्नीकरणाकरिता प्रतिवर्षी एआयसीईटीचे रिन्यूअल शुल्क भरणे आवश्यक असते. गुरुवार ५ मार्च ही शुल्क भरण्याची अंतिम तारीख आहे. या प्रस्ताव व शुल्क भरण्यावर महाविद्यालयाच्या अध्यक्षांच्या स्वाक्षरीची आवश्यकता असते. परंतु अध्यक्षांनी चालू वर्षीचा प्रस्ताव व शुल्क अद्यापही दाखल केला नसल्याचा आरोप यावेळी पदाधिकाऱ्यांनी केला. पुढील वर्षाची महाविद्यालयाची प्रक्रिया बंद पडण्याची शक्यता गृहित धरून सर्वानुमते बेमुदत शहर बंद करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. त्यानंतर सायंकाळी सातपासून शहर बंद करण्यात आले. या बैठकीस माजी नगराध्यक्ष भाई प्रकाशराव देशमुख, सुधीर कदम, अमर हंगरगेकर, किरण खपले, किशोर गंगणे, मिलींद रोकडे, राजाभाऊ माने, प्रकाश धट, दिलीप गंगणे, उत्तम अमृतराव, भारत कदम, ऋषी मगर, उपाध्यक्ष गणेश कदम, सुहास साळुंके, विशाल रोचकरी, भारत कदम, इंद्रजित साळुंके, जयवंतराव कांबळे, दयानंद हिबारे, प्रा. हेमंत वडणे, महेश चोपदार, दिलीप मगर, बबलू सूर्यवंशी, समाधान कदम, द्विग्वीजयसिंह पाटील, विजय कंदले, विश्वजित पाटील, अॅड. धीरज पाटील आदींची उपस्थिती होती. (वार्ताहर)तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालय बंद पडू नये असेच प्रशासनाचे प्रयत्न आहेत. त्यामुळे महाविद्यालयाला गतवैभव मिळवून देण्यासाठी आम्ही अनेक पावले उचलली आहेत. संलग्नीकरणाकरिता ३७ लाख रुपये शुल्क भरावयाचे आहेत. मात्र त्यासाठीची विशिष्ठ प्रक्रिया आहे. संस्थानचा अध्यक्ष असलो तरी, एवढी मोठी रक्कम भरण्याबाबतचा निर्णय घेण्याचे अधिकार मला एकट्याला नाहीत. सदर रक्कम भरण्याचा प्रस्ताव संस्थानच्या सर्वसाधारण सभेत ठेवून त्याला मंजूरी घेणे आवश्यक आहे. आमदार मधुकरराव चव्हाण यांचेसोबतही याविषयावर चर्चा झाली असून, याबाबतचा प्रस्ताव लवकरच विश्वस्त समितीसमोर ठेवण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी सांगितले. केवळ शुल्क भरले नाही. म्हणून महाविद्यालय बंद पडणार नाही. महाविद्यालयाची गुणवत्ता सुधारण्यासाठी सर्वांना पुढाकार घ्यावा लागणार आहे. यासाठी पुढाकार घेण्याऐवजी महाविद्यालय बंद पडणार अशी अफवा पसरविण्यात येत आहे. हा प्रकार चुकिचा असून अशा प्रवृत्तीविरोधात कारवाई करण्यात येईल. असा इशाराही जिल्हाधिकारी नारनवरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिला.
तुळजापूर शहर बंदला प्रतिसाद
By admin | Updated: March 5, 2015 00:01 IST