लातूर : दुष्काळग्रस्त परिस्थितीमध्ये दिवसेंदिवस चाऱ्याचा प्रश्न गंभीर होत आहे़ एकूण चाऱ्यापैकी ४० टक्के चारा वाया जात असल्यामुळे जिल्हा पशुसंवर्धन विभागाच्या वतीने त्या चाऱ्यावर प्रक्रिया करुन वाया जाणारा चारा वाचविण्याचे प्रशिक्षण शेतकऱ्याला दिले जात आहे़ हा उपक्रम जिल्ह्यातील ९४३ गावात राबविला जात असल्याने दुष्काळग्रस्त परिस्थितीत या माध्यमातून शेतकऱ्याला आधार मिळत आहे़ लातूर जिल्ह्यात एकूण पशुधनाचा आकडा ६ लाख १५ हजारांवर गेला आहे़ या पशुधनासाठी वर्षाकाठी ११ लाख मेट्रीक टन चारा लागतो़ परंतु या वर्षी दुष्काळग्रस्त परिस्थिती निर्माण झाल्याने एप्रिल पर्यंत पुरेल एवढाच चारा उपलब्ध आहे़ यातही एकूण चाऱ्यापैकी ४० टक्के चारा वाया जातो़ हा वाया जाणारा चारा वापरात यावा़ या दृष्टीकोनातून पशुसंवर्धन विभागाच्या वतीने सोयाबीन, तूर, हरभरा, बाजरी, मका, गहू या पिकांच्या गुळ्यापैकी १०० किलो गुळी घेऊन ४० लिटर पाणी, १ किलो युरीया, १० किलो गुळ, २ किलो मिनरल मिस्चर, फवारणी करुन (क्षारयुक्त पावडर) एकत्र करुन या गुळ्यावर फवारणी करुन त्या गुळ्याला झाकून १२ ते २४ तास ते गुळी हवाबंद ठेवल्यास, या गुळ्यातील अमोनिया निघून गेल्याने स्वादिष्ट गुळी तयार होते़ ही गुळी जनावरांसाठी वापरले गेल्यास वाया जाणाऱ्या चाऱ्याचे प्रमाण कमी होते़ (प्रतिनिधी)
वाया जाणाऱ्या चाऱ्यावर प्रक्रिया; पशुधनाला सकस चारा !
By admin | Updated: January 29, 2015 01:15 IST