भोकरदन : तालुक्यातील दानापूर येथील जुई धरणात १० फुट पाणीसाठा झाल्यामुळे भोकरदन शहरासह तालुक्यातील २० गावांचा पाणीटंचाईचा प्रश्न मिटला आहे़भोकरदन शहरासह दानापूर, पिंंपळगाव रेणुकाई, सिपोरा बाजार, बाभूळगाव, निंबोळा, वडशेद, दगडवाडी, मनापूर, भायडी, विरेगाव, देहेड, वरूड बु, गोद्री, कल्याणी, करजगाव, सुरंगळी, कठोरा बजार, पळसेखड मुर्तड,तळणी या गावांना जुई धरणातून पाणीपुरवठा करण्यात येतो. मात्र या वर्षी पाऊस नसल्याने धरणात केवळ ४ फुट पाणीसाठा शिल्लक होता. मात्र दोन दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे धरणातील पाणीसाठा ६ फुट झाला. तर २४ आॅगस्ट रोजी आन्वा, वाकडी, गोळेगाव या भागात जोरदार पाऊस झाल्यामुळे २५ आॅगस्ट रोजी धरणातील पाणीसाठ्यात ४ फुटाने वाढ झाली. धरणात आता १० फुट पाणीसाठा झाला आहे. सध्या तालुक्यात जोरदार पाऊस सुरू असल्याने धरण दोन ते तीन दिवसांमध्ये ओव्हरफ्लो होण्याची दाट शक्यता असल्याचे धरणावरील कर्मचारी शेख बशीर यांनी सांगिंतले. धरणात सध्या असलेल्या पाणी साठ्यामुळे भोकरदन शहरासह २० गावाचा पाणी प्रश्न एक वर्षासाठी मिटला आहे़ (वार्ताहर)
जुई धरणात १० फुट पाणी, वीस गावांचा प्रश्न मिटला
By admin | Updated: August 26, 2014 00:02 IST