उस्मानाबाद : चुकीची बिले, खंडीत वीज पुरवठा आदींबाबत नेहमीच ओरड करणार्या जिल्ह्यातील ग्राहकांनी वीज वितरण कंपनीने ग्राहकांच्या तक्रारी ऐकून घेण्यासाठी सुरू केलेल्या कॉल सेंटरकडे मात्र कानाडोळा केल्याचे चित्र आहे. गेल्या तीन महिन्यात या जिल्ह्यातून केवळ ३६२ ग्राहकांनी तक्रारी नोंदविल्या असून, याउलट लातूर आणि बीड जिल्ह्यातून मात्र सुमारे तीन पट तक्रारी दाखल झाल्या आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यात वीज वितरण कंपनीकडून अंदाजे वीज बिलाची तसेच नादुरूस्त ट्रान्सफार्मर आदींबाबतच्या तक्रारी नेहमीच ऐकावयास मिळतात. याबाबत लोकप्रतिनिधींनी बोलाविलेल्या बैठकांमधूनही ग्रामस्थांकडून तक्रारींचा अक्षरश: पाऊस पाडला जातो. यावरून लोकप्रतिनिधी संबंधित अधिकार्यांना धारेवरही धरतात. याचबरोबर स्थानिक कार्यालयात ग्राहकांच्या तक्रारींची दखल घेतली जातनाही, अशीही ओरड ग्राहकांची होती. त्यामुळे ग्राहकांच्या तक्रारी थेट महावितरणपर्यंत पोहोंचून त्याची तात्काळ सोडवणूक करता यावी, या उद्देशाने वीज वितरण कंपनीने स्थानिक पातळीवरील सर्व फ्युज कॉल सेंटर बंद करून संबंध महाराष्टÑासाठी मुंबई व पुणे येथे कॉल सेंटर सुरू केले आहे. या ठिकाणी टोल फ्री क्रमांकाच्या माध्यमातून विजेच्या तक्रारी घेतल्या जातात. वीज वितरण कंपनीच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार गेल्या मार्च महिन्यापासून आतापर्यंत उस्मानाबाद जिल्ह्यातून केवळ ३६२ तक्रारी या कॉल सेंटरवरून नोंदविल्या गेल्या आहेत. याउलट बीड जिल्ह्यातून ७३४ तर लातूर जिल्ह्यातून तब्बल ८४८ ग्राहकांनी विविध स्वरूपाच्या तक्रारी नोंदविल्या आहेत. जिल्ह्यातून नोंदविलेल्या गेलेल्या ३६२ तक्रारींमध्ये मार्च महिन्यात १२१, एप्रिल महिन्यात १०५ तर मे महिन्यात आतापर्यंत १३६ ग्राहकांनी या तक्रारी नोंदविल्या आहेत. दरम्यान, ग्राहकांनी या सुविधेचा फायदा घेऊन आपल्या तक्रारींची सोडवणूक करावी, असे आवाहन लातूर परिमंडलाचे मुख्य अभियंता पाटील व उस्मानाबादचे अधीक्षक अभियंता अरूण पापडकर यांनी केले आहे. (प्रतिनिधी) तीन नंबर नोंदविण्याची सोय वीज कंपनीने सुरू केलेल्या या कॉल सेंटरचा टोल फ्री क्रमांक हा १८०० २३३ ३४३५ व १८०० २०० ३४३५ हे क्रमांक असून, ते २४ तास खुले आहेत. ग्राहकाला कुठल्याही कंपनीच्या मोबाईल किंवा दूरध्वनीवरून कॉल करता येतो. सुरूवातीला एकदा १२ अंकी वीज ग्राहक क्रमांक नोंदविणे आवश्यक असून, यासाठी ग्राहकाला आपले तीन वेगवेगळे फोन अथवा मोबाईल नंबर नोंदविता येणार आहेत. यानंतर नोंदविलेल्या क्रमांकावरून तक्रार केल्यास पुन्हा ग्राहकाला वीज ग्राहक क्रमांक सांगण्याची गरज पडणार नाही.
तक्रारी करण्यातही उस्मानाबाद पिछाडीवर
By admin | Updated: May 30, 2014 00:25 IST