संजय कुलकर्णी , जालनाजिल्हा परिषदेच्या २७ कोटींच्या ठेवीची रक्कम टप्प्याटप्प्याने परत करण्यासाठी आता जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दरमहा एक कोटींची रक्कम खात्यातून परत करण्याचा तोडगा काढला आहे. त्यास जिल्हा परिषद प्रशासनानेही अनुकुलता दर्शविल्याचे समजते.जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून जिल्हा परिषदेचा तीन कोटींचा धनादेश वटेनासा झाल्याचे वृत्त लोकमत हॅलो जालनाच्या २९ नोव्हेंबर रोजीच्या अंकातून प्रसिद्ध होताच त्याच दिवशी बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांची भेट घेतली. जिमस बँकेचा जवळपास व्यवहार हा शेतकरी खातेदारांच्या व्यवहारावरच अवलंबून आहे. सध्या दुष्काळाची स्थिती असल्याने कर्जाची वसुली करता येत नाही. त्यामुळे ठेवीचा परतावा करण्यासाठी रक्कम मर्यादा कमी करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.यासंदर्भात जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी जी.बी. चव्हाण यांना विचारणा केली असता त्यांनी या बाबीला दुजोरा दिला आहे. ४जिल्हा परिषदेच्या जिल्हा निधीअंतर्गत विविध शीर्षकाखाली २७ कोटींची रक्कम चार वर्षांपासून जिमस बँकेत पडून आहे. बँकेची आर्थिक परिस्थिती पाहता ही रक्कम एकाचवेळी काढणे शक्य नाही. त्यामुळे थोडी थोडी करून का होईना ही रक्कम काढून घेण्याचे निर्देशही शासनाने दिलेले आहेत. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या वित्त विभागाने गेल्या महिन्यात ३ कोटींचा धनादेश स्टेट बँक आॅफ हैद्राबादच्या शाखेमार्फत जिल्हा बँकेत पाठविला. परंतु तो दोनवेळा वटला नाही.
जिमस बँक देणार दरमहा एक कोटी
By admin | Updated: December 10, 2014 00:39 IST