जालना : उन्हाळ्याच्या काळात शहरात आठवड्यातून दोनदा पाणीपुरवठा करण्याचे आदेश मुख्याधिकारी दीपक पुजारी यांनी पाणीपुरवठा विभागाला दिले आहेत. मात्र त्यासाठी पाणीपुरवठ्याचा वेळ कमी करण्यात येणार असल्याचे सुत्रांनी सांगितले. सध्या जायकवाडी पाणीपुरवठा योजनेद्वारे १५ एम.एल.डी. व घाणेवाडी उद्भवाद्वारे ६ एम.एल.डी. असे २१ एम.एल.डी. पाणी दररोज घेतले जाते. शहरात ४८ एम.एल.डी. पाण्याची गरज आहे. सद्यस्थितीत सहा दिवसांआड पाणीपुरवठा केला जातो. मात्र काही भागात तीन-चार तास तर काही भागात दीड ते दोन तास पाणीपुरवठा केला जातो, असे विविध भागातील नागरिकांकडून सांगण्यात येते. घाणेवाडी जलाशयात सव्वाआठ फूट पाणीसाठा उपलब्ध आहे. या उद्भवातून दरमहा दीड फूट पाण्याचा उपसा केला जातो. मात्र सध्या उन्हाळा असल्याने अडीच फूट पाणी घेतले जात आहे. त्यानुसार आगामी तीन महिने पुरेल एवढा पाणीसाठा जलाशयात आहे. या जलाशयाद्वारे नवीन जालना विभागाला पाणीपुरवठा केला जातो. सध्या जायकवाडी व घाणेवाडी हे दोन्ही स्त्रोत असल्याने काही दिवस जायकवाडीद्वारेच नवीन जालना भागासही पाणीपुरवठा केल्याचे सुत्रांनी सांगितले. शहरवासियांना आठवड्यातून दोनदा पाणी देण्यासाठीचे नियोजन पाणीपुरवठा विभागाकडून सुरू असल्याची माहिती अभियंता दासवाड यांनी दिली. ज्या भागात दीड-दोन तास पाणीपुरवठा होतो, तेथे अर्धा तासांची वेळ कमी करून पाणीपुरवठ्याचे दिवस वाढवावेत, अशी सूचना मुख्याधिकारी यांनी केली असल्याचे ते म्हणाले.याबाबत मुख्याधिकारी दीपक पुजारी म्हणाले, सध्या उन्हाळ्यात पिण्याचे पाणी मोठ्या प्रमाणावर लागत असल्याने शहरात पाणीपुरवठ्याचे दिवस वाढविण्याचा प्रयत्न नगरपालिकेकडून सुरू आहे.
आता आठवड्यातून दोनदा पाणी देणार
By admin | Updated: April 9, 2015 00:11 IST