औरंगाबाद : अॅट्रॉसिटी कायदा अधिक प्रभावी झाला पाहिजे. त्यासाठी या कायद्यात बदल करण्याची गरज आहे, असा सूर संत तुकाराम नाट्यगृहात आयोजित करण्यात आलेल्या ‘अॅट्रॉसिटी जनजागरण परिषदे’त निघाला. पक्षीय मतभेद बाजूला ठेवून एकत्र आलेल्या आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी रविवारी अॅट्रॉसिटी जनजागरण परिषद आयोजित केली. या परिषदेत निवृत्त आयपीएस अधिकारी सुधाकर सुरडकर, माजी मंत्री गंगाधर गाडे, सामाजिक कार्यकर्त्या मनीषा तोकले, बंजारा नेते हरिभाऊ राठोड, अजमल खान, प्रा. जयदेव डोळे यांनी मार्गदर्शन केले. सुधाकर सुरडकर म्हणाले की, अॅट्रॉसिटी कायद्याचा अभ्यास करा. हा कायदा अधिक व्यापक आहे. अलीकडे हा कायदा रद्द करण्याची टूम निघाली आहे. अॅट्रॉसिटी अॅक्ट नेमका काय आहे, हे आपण समजून घेऊ व त्याचा योग्य वापर करू तरच परिस्थिती सुधारेल. वर्चस्ववादातून प्रस्थापित मंडळी या कायद्याचा गैरवापर करतात. तो आपण थांबवला पाहिजे. आजपर्यंत ज्यांनी दलितांचा व्होट बँक म्हणून वापर केला, तेच राजकारणी आता दलितांना उद्ध्वस्त करण्याचे डावपेच रचत आहेत. ते कोण आहेत, ये समझने वाले को इशारा काफी है, असे म्हणत गंगाधर गाडे यांनी महाराष्ट्रातील प्रस्थापित राजकारण्यांकडे अंगुलीनिर्देश केला. खेड्यापाड्यातील लोकांना, तरुण मुला-मुलींना भडकावून दलित विरुद्ध सवर्ण अशी तेढ निर्माण करीत आहेत. ‘रात्र वैऱ्याची आहे, जागे राहा’, समाज जागृतीसाठी आपली ताकद पणाला लावा, असे आवाहन यावेळी गाडे यांनी केले. हरिभाऊ राठोड, मनीषा तोकले, अजमल खान, जयप्रकाश नारनवरे यांनीही समयोचित मार्गदर्शन केले. मुस्लिम, भटके, विमुक्त, ओबीसी समाज तुमच्यासोबत आहे, अशी ग्वाही या परिषदेत सर्व मान्यवरांनी दिली. या परिषदेत अॅट्रॉसिटी अॅक्ट अधिक कडक करावा, अहमदनगर जिल्हा अॅट्रॉसिटीप्रवण जिल्हा घोषित करावा, यासह एकूण १४ ठराव पारित करण्यात आले. शिर्डी येथील पीडित मुलाचा भाऊ आकाश शेजवळ हा या परिषदेत उपस्थित होता. त्याने सरकारी वकिलाविरुद्ध अविश्वास व्यक्त केला. तेव्हा अॅट्रॉसिटी जनजागरण परिषद आयोजन समितीने वकिलाचा खर्च उचलण्याची ग्वाही दिली. या परिषदेत प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित असलेले हरिभाऊ राठोड यांच्या कारचे नुकसान अनवधानाने काही तरुणांकडून झाले. नुकसानभरपाई देण्याचे आश्वासनही समितीने दिले. २ आॅक्टोबर रोजी पुढील दिशा ठरविण्यासाठी नागसेनवन परिसरात बैठक आयोजित करण्याचे यावेळी जाहीर करण्यात आले. या परिषदेचे वैशिष्ट्य हे की, सारी आंबेडकरी युवाशक्ती यानिमित्ताने एकवटलेली होती. संयोजन समितीचे सदस्य फ्रंटवर नव्हते की कुठे मिरवताना दिसत नव्हते. सिद्धार्थ मोकळे यांनी प्रास्तावीक केले.मराठा मुलगा म्हणतो, बाबासाहेब आमचेचया परिषदेत स्वप्नील भुमरे या मराठा तरुणाने जोशपूर्ण भाषण केले. त्याने भाषणाची सुरुवातच ‘जयभीम..... जय शिवराय’च्या नाऱ्याने केली. संविधान लिहिताना या देशातील ओबीसींचा आणि मराठा कुणब्यांचा विचार करणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे खऱ्या अर्थाने आमचा बाप आहे, या त्याच्या वाक्याने तर टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला. छत्रपती शिवाजी महाराजांनी, आपल्या राज्यात स्त्रियांवर अन्याय- अत्याचार करणाऱ्या पाटलांचे हात कलम केले होते, तेव्हापासून अॅट्रॉसिटी अस्तित्वात आहे, असेही स्वप्नीलचे म्हणणे पडले.आता आपण गुन्हे करण्याची परवानगी मागतो आहोत की काय, असा सवालही त्याने उपस्थित केला. खरे तर मराठा आणि महार हे वेगळे नाहीतच. शत्रू तर मुळीच नाहीत. हा सारा इतिहास नीट तपासून पाहण्याचे आवाहन करीत भुमरेने सवाल केला की, मराठा- ओबीसींच्या सवलतींसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला. तुम्ही ग्रामपंचायत सदस्यत्वाचा तरी द्याल का?
‘अॅट्रॉसिटी’ कायदा अधिक प्रभावी करा
By admin | Updated: September 26, 2016 00:39 IST