औरंगाबाद : महाराष्ट्राचे लाडके आबा गेले आणि औरंगाबादवरही शोककळा पसरली. शोकाकुल औरंगाबादकरांनी आबांना भावपूर्ण श्रद्धांंजली अर्पण केली. आबा आणि औरंगाबाद यांचे एक विशेष नाते प्रस्थापित झाले होते. आबांमुळेच औरंगाबादला भारत बटालियनची स्थापना होऊ शकली. आबांमुळेच औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या नियोजित इमारतीसाठी जागा उपलब्ध झाली. गेली अनेक वर्षे आबा ईदनिमित्त सतत औरंगाबादला येऊन गेले आहेत. निवडणुकांच्या काळात अनेक प्रचारसभांमधून आबांनी आपल्या खुमासदार शैलीत विरोधकांच्या टोप्या उडवल्या. आबांच्या अकाली जाण्याने त्यांच्या चाहत्यांवर शोककळा पसरली. अनेकांना अश्रू आवरता आले नाहीत. राजकारणापलीकडचा स्नेह जपला १९९० ला आबा आणि मी सोबत आमदार झालो. तेव्हापासून अत्यंत जिव्हाळ्याचे कौटुंबिक आमचे संबंध होते. मी ज्यावेळी गृहनिर्माणमंत्री झालो, त्यावेळी त्यांनी माझे आवर्जून अभिनंदन केले होते. मला हृदयविकाराचा झटका आला, त्यावेळीही दवाखान्यात माझ्या भेटीस आबा आले होते. माझे बंधू वारले, त्यावेळीही ते माझ्या घरी आले. राजकारणापलीकडचा आमचा स्नेह होता. हा स्नेह मनापासून जपणारा हा नेता होता. माझी अनेक कामे त्यांनी केली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या जडणघडणीत त्यांचा मोठा वाटा होता. पक्षभेद बाजूला ठेवून त्यांनी राजकारण केले. एक अभ्यासू राजकारणी म्हणून त्यांची महाराष्ट्रावर छाप होती. आजारी असतानाही ते नागपूरच्या अधिवेशनाला आले होते. यावरून त्यांची तळमळ दिसून येते. आबांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली.-खा. चंद्रकांत खैरेसदैव महाराष्ट्राच्या स्मरणात राहतीलमहाराष्ट्राचे लाडके आबा गेले. ते सर्वसामान्यांचा आवाज होते. तंटामुक्ती अभियान, ग्रामस्वच्छता अभियानामुळे आबा सदैव महाराष्ट्राच्या स्मरणात राहतील. सर्वसामान्यांबद्दलचा कळवळा, योग्य नेतृत्वगुण व सुंदर वक्तृत्वशैली ही आबांची खास वैशिष्ट्ये होती. त्यांच्या निधनामुळे महाराष्ट्रावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी शिक्षक संघटना आबांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करीत आहे.-विक्रम काळे, शिक्षक आमदार, मराठवाडा विभागकधीही मोठेपणा दाखवला नाहीआर. आर. पाटील यांच्या निधनामुळे सामान्य जनतेचा नेता गेला. आबांना जवळून अनुभवयाची संधी आम्हाला मिळाली. गरिबीतून आल्यामुळे त्यांना त्याची जाण होती. उपमुख्यमंत्रीपदापर्यंत पोहोचलेल्या आबांनी कधीही मोठेपणा दाखवला नाही.-बाबूराव पवार, राज्य उपाध्यक्ष, शिवसंग्राम संघटनाकौटुंबिक संबंध जोपासले माझे आणि आबांचे कौटुंबिक संबंध राहिले. दिवाळीच्या सुमारास मी दरवर्षी तासगावला जात असे. तेथे काही दिवस राहत असे. आबा मला आपल्या कुटुंबातलाच एक मानायचे. उपमुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी मला मारलेली मिठी अजूनही आठवते. त्यांच्या निधनामुळे मला अतीव दु:ख झाले आहे.-प्रा. चंद्रकांत भराट, नेते छावा राजकीय गाडगेबाबा गेले मी जिल्हा परिषद अध्यक्ष असताना आबा महाराष्ट्राचे ग्रामविकासमंत्री होते. त्यावेळेस त्यांच्याशी माझा चांगला संबंध आला. ग्रामस्वच्छता अभियानामुळे ते आमचे राजकीय गाडगेबाबा ठरले. मराठवाड्याच्या राजधानीत औरंगाबाद जिल्हा परिषदेला इमारत नाही म्हणून त्यांनी दहा एकर जागा उपलब्ध करून दिली व नंतर या जागेचे भूमिपूजनही झाले. त्यांचे निधन आम्हाला फार मोठा धक्का होय.-हरिश्चंद्र लघाने पाटील, माजी अध्यक्ष, जिल्हा परिषदजिवाभावाचा मित्र गेलामाझा अत्यंत जवळचा, जिव्हाळ्याचा, जिवाभावाचा मित्र गेला. राजकीय जीवनात कसे प्रामाणिक राहावे याचे मूर्तिमंत आदर्श उदाहरण म्हणजे आमचे आर. आर. आबा. आबांनी आमच्यावर व आम्ही आबांवर नितांत प्रेम केले. राजकारणाच्या पलीकडे जाऊन. ४०-४५ वर्षांच्या राजकीय जीवनात चारित्र्यावर एकही शिंतोडा नसलेला, भ्रष्टाचारापासून कोसो दूर असणारा, अमोघ वक्तृत्वाने सगळ्यांना घायाळ करून सोडणारा, हसत-खेळत विरोधकांच्या टोप्या उडविणारा असा उत्तम अभ्यासू वक्ता, महाराष्ट्राच्या प्रत्येक प्रश्नांची जाणीव असणारा, सभागृहामध्ये हलकं फुलकं वातावरण निर्माण करणारा, घमेंडीचा लवलेश नसणारा आणि शरद पवार यांचा निस्सीम, प्रामाणिक, जीव ओवाळून टाकणारा कार्यकर्ता. नियतीने घात केला. आबांसारखा एक चांगला मित्र, चांगला माणूस आमच्यापासून हिरावून नेला आहे. एवढे वर्षे सत्तेत राहूनही आबांचे मुंबईत स्वत:चे घर नाही. त्यांचा मृत्यू मनाला चटका लावून गेला.-बाळा नांदगावकर, मनसे नेते सामान्य कार्यकर्त्यांना बळ देणारा नेता हरपला ग्रामीण महाराष्ट्राची नस जाणणारा, सामान्य कार्यकर्त्यालाही सहज आपलेसे करणारा महाराष्ट्राच्या राजकारणातील अग्रणी लोकनेता आपण आबांच्या रूपाने गमावला आहे. स्व. यशवंतराव चव्हाण, स्व. वसंतदादा पाटील यांचा पुरोगामी विचारांचा वसा आणि वारसा आबांनी यशस्वीपणे चालविला. लोकप्रतिनिधी म्हणून मी पदवीधरांचे त्याच बरोबरच सर्वसामान्यांचे प्रश्न घेऊन ज्या ज्यावेळी आबांकडे जायचो, त्यावेळी तात्काळ त्या प्रश्नांची सोडवणूक करण्याचे काम आबांनी केले.-सतीश चव्हाण, आमदार, मराठवाडा पदवीधर मतदारसंघ
महाराष्ट्राचे लाडके आर.आर.
By admin | Updated: February 17, 2015 00:43 IST