कळंब : जिल्ह्यातील सर्वाधिक आर्थिक उलाढाल होणारी बाजारपेठ म्हणून ओळख असलेल्या कळंब बाजार समिती आवारात शेतमालाला अपेक्षित दर मिळत नसल्याने शेतकरी निराश झाले आहेत. भावात उठाव तर मिळतही नाहीच शिवाय आडत, हमाली आदीबाबतची रक्कम मात्र शेतकऱ्याला चुकती करावी लागत आहे. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर लगतच्या लातूर, बार्शीप्रमाणे आडत, हमालीची आकारणी करावी, अशी शेतकरी वर्गातून मागणी होत आहे.कळंब कृषी उत्पन्न बाजार समितीची १९५३ साली स्थापना झाली असून, जिल्ह्यातील सर्वात मोठी कृषी बाजारपेठ म्हणून तिची ओळख आहे. जवळपास २७ एकरच्या विस्तीर्ण जागेत आकाराला आलेल्या या बाजारात नोंदणीकृत व्यावसायिकांची संख्या जास्त असली तरी शंभरावर व्यावसायिक कृषी मालाची खरेदी विक्री करतात. २०१३-१४ या आर्थिक वर्षात ८१ कोटीच्या आसपास आर्थिक उलाढाल होवून ३ लाख १८ हजार क्विंटल मालाची या बाजार आवारात आवक नोंदविली गेली आहे.मापट बंद झाल पण...कळंब बाजार समिती आवारात अनेक वर्ष शेतकऱ्यांच्या मालाची चढ उतार, तोलाई करणारे हमाल ‘मापट’ म्हणून हमाली व्यतिरिक्त माल घेत होते. यामध्ये शेतकऱ्यांचे नुकसान होत असल्याने मध्यंतरी ही पद्धत बंद करण्यात आली. बाजार समिती व्यवस्थापन यासंदर्भात नियमाप्रमाणे प्रतिक्विंटल ८ रुपये ४४ पैसे एवढीच हमाली अदा करावी लागत असल्याचे सांगत असले तरी प्रत्यक्षात मात्र यापेक्षा जादा दराने हमाली घेतली जात असल्याचे चित्र आहे. यामुळे हमालाचेही नुकसान होवू नये व शेतकऱ्यांचीही लुट होवू नये, असा मध्यबिंदू व्यवस्थापनाने अनुसरणे आवश्यक आहे. (वार्ताहर)४बाजार समिती आवारात रस्ते असले तरी मुख्य रस्ता सोडता इतर रस्त्याची सुधारणा करणे आवश्यक आहे. बाजार आवारात शेतमालाची खरेदी विक्री करणाऱ्या व्यावसायिकांपेक्षा इतर व्यावसाय करणाऱ्यांचीच संख्या वाढत आहे. शेतकऱ्यांसाठी पिण्याच्या पाण्याची आरामगृहाची कमतरता आहे. स्वच्छतागृहाची वानवा आहे. याकडे बाजार समितीने लक्ष देवून सुधारणा करणे गरजेचे आहे. बाजार आवारात इलेक्ट्रॉनिक वजन काट्याचा वापर केला जात असला तरी काही छोटे व्यापारी याचा अवलंब करताना दिसून येत नाहीत.४बाजार आवारातील व्यापारी आपल्याकडे शेतमाल विक्रीसाठी आलेल्या शेतकऱ्यांकडून आडत आकारणी करतात. कळंब आवारात याचप्रमाणे शेकडा ३ टक्के आहे. इतरच्या बाजार समितीमध्ये याचे प्रमाण कळंबपेक्षा कमी आहे. लगतच्या लातूर येथे २ टक्के तर बार्शी येथे २.५ टक्के शेकडा आडत आकारणी केली जात असल्याचे समजते. परंतु कळंब येथे मात्र वर्षानुवर्ष ३ टक्के आडत घेतली जात असल्याने शेतकऱ्यांना जादा रक्कम मोजावी लागते. यामुळे दुष्काळी स्थितीचे गांभिर्य ओळखून तरी आडत कमी करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.४कळंब कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात तालुक्यातील शेतकऱ्यांसह लगतच्या वाशी, केज तालुक्यातील काही गावातील शेतकरी माल विक्रीसाठी आणतात. मात्र यावर्षी गतवर्षीच्या तुलनेत सर्व प्रकारच्या शेतमालाला दर कमी मिळत असल्याने शेतकरी नाराज आहेत. व्यापारीही आपल्या खरेदीदारांचा दर पाहून हात आखडता घेत आहेत. यामुळे आधीच दुष्काळी स्थितीमुळे घटलेल्या एकरी उत्पादनामुळे हैराण असलेल्या शेतकऱ्यांची मोठी निराशा होत आहे.
आडत,हमाली शेतकऱ्यांच्या माथी
By admin | Updated: December 18, 2014 00:35 IST