बीड: बिंदूसरा नदीपात्राच्या लगत पूर रेषेत रहात असलेल्या ३५ कुटुंबांना बीड नगर परिषदेने पावसाळ्या पुर्वी स्थलांतर करण्याच्या नोटिसा बजावल्या आहेत. यामध्ये खास बागेतील तुळजा भवानी मंदिर परिसरातील रहिवाशांचा समावेश असून सर्वेक्षण सुरू आहे. शंभरच्या जवळपास नागरिकांना पूर रेषेतून स्थलांतर करण्याच्या नोटीसा देण्याची शक्यता असल्याचे न.प. मधील अधिकार्यांनी सांगितले. पावसाळ्याला अजून आठ ते नऊ दिवस बाकी आहे. यातच बिंदूसरा नदीचे पात्र बीड शहरातून जात असल्याने जास्त पाऊस पडला तर शहरातील नदी पात्राच्या लगत रहाणार्या नागरिकांना याचा धोका होऊ शकतो. अचानक आलेल्या पावसामुळे मनुष्य हानी होऊ नये या दृष्टिकोनातून बीड नगर परिषदेकडून योग्य ती दक्षता घेण्यात येत आहे. बीड शहरातून जाणार्या बिंदूसरा नदीपत्राच्या लगत असलेल्या घरांचे सर्वेक्षण करण्याचे काम न. प. ने हाती घेतले आहे. यामध्ये गुरूवार पर्यंत ३५ जणांना पूर रेषेतून स्थलांतर करण्याच्या लेखी सूचना देण्यात आलेल्या असल्याचे न. प. तील स्वच्छता निरीक्षक विश्वंभर तिडके यांनी ‘लोकमत’ शी बोलताना सांगितले. पुढील आठवड्यात शहरातील हिरालाल चौक परिसरात तसेच बिंदूसरा नदी पात्राच्या लगत रहात असलेल्या नागरिकांच्या घरांचा सर्व्हे करून स्थलांतराच्या नोटिसा बजावण्यात येणार असल्याचे अधिकार्यांनी सांगितले.(प्रतिनिधी)
पूररेषेत राहताय? हलवा पसारा !
By admin | Updated: May 30, 2014 00:23 IST