लातूर : महिला अत्याचार तसेच ३७६ व ३०२ कलमाअंतर्गत दाखल झालेल्या गुन्ह्यांची उकल शिक्षेच्या दृष्टीने व्हावी म्हणून पोलिसांची गुरुवारी लातुरात कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेला सरकारी अभियोक्ता रवीन्द्र निकम यांनी मार्गदर्शन केले. यावेळी रवीन्द्र निकम म्हणाले, फिर्याद आल्यानंतर गुन्हे दाखल केले जातात. परंतु, या गुन्ह्यांची उकल करताना बारकाईने तपास करणे आवश्यक आहे. जेणेकरून संबंधित आरोपीला शिक्षा होईल, असे सबळ पुरावे पोलिसांच्या हाती तपासात लागले पाहिजेत. त्यासाठी घडलेल्या गुन्ह्यांचा बारकाईने अभ्यास करून तपासाच्या टीप्स तयार केल्या पाहिजेत. त्यानुसार पुरावे हस्तगत करणे आवश्यक आहे. तरच शिक्षेचे प्रमाण वाढणार आहे. अन्यथा गुन्हा दाखल झाला, आरोपीला न्यायालयात हजर केले अन् जामीन मिळाला, असेच होईल. यावेळी अतिरिक्त पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, उपविभागीय पोलिस अधिकारी तिरुपती काकडे यांची प्रमुख उपस्थिती होती. जिल्ह्यातील सर्व ठाण्यांचे प्रभारी अधिकारी व ठाण्याअंतर्गत दोन पोलिस कर्मचारी या कार्यशाळेला उपस्थित होते. मालेगाव येथील सरकारी अभियोक्ता रवीन्द्र निकम यांनी यावेळी नवीन कायद्याची माहितीही पोलिसांना दिली. (प्रतिनिधी)
गुन्ह्यांचा शोध अन् शिक्षेचे प्रमाण वाढवा
By admin | Updated: May 30, 2014 00:25 IST