परतूर : परतूर तालुक्यात पाणी पातळी घटल्याने शेतकरी आतापासूनच विहिरी फोडण्यावर भर देत असून, भविष्यात पाणी टंचाईचे संकट उभे राहु नये म्हणून काळजी घेत आहेत.तालुक्यात यावर्षी पावसाचे प्रमाण अल्प असल्याने विहिरी, बोअर, तलावांच्या पाणी पातळीत वाढ झाली नाही, जेमतेम पाण्यावर शेतकऱ्यांनी आतापर्यंत बागायती पिके जोपासली. गहू, हरभरा ही पिके विजेचा सामना करीत अहोरात्र जागरण करून काढण्याच्या प्रयत्नात आहेत. ही पिके हातात पडली तरी, अपुरे पाणी आणि सतत जाणारी वीज यामुळे उत्पन्नावर विपरीत परिणाम होणार आहे. जानेवारीतच विहिरी, बोअर यांनी तळ गाठला आहे. विहिरीची पाणी पातळी झपाट्याने घटली आहे. त्यामुळे आलेल्या दुष्काळी संकटावर मात करण्यासाठी विहिरीत उभे आडवे बोअर घेत आहेत. तसेच विहिरी फोडण्याचे काम हाती घेत आहेत. बोअरला पाणी लागेल की नाही याची शाश्वती नसल्याने विहिरीतील साठवण वाढवण्यासाठी शेतकरी विहिरीची खोली वाढवण्याच्या प्रयत्नात आहेत. आतापासूनच शेतकरी विहिरी फोडत असल्याने क्रेन, फोडण्यासाठी ट्रॅक्टर, मजूरांची अडचण भासू लागली आहे. (वार्ताहर)
परतूर तालूक्यात विहिरी फोडण्यावर भर
By admin | Updated: January 18, 2015 00:27 IST