जालना : यावर्षी दीर्घ प्रतीक्षेनंतर का असेना समधानकारक पाऊस पडल्यानंतर सुखावलेल्या शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांना यंदाची दिवाळी हर्षोल्हासात जाईल, असे अपेक्षित असतानाच दिवाळीपूर्वीच विधानसभा निवडणुकीचा बार उडाल्याने छोट छोट्या व्यावसायिकांसह काही चणाक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्यांची दिवाळी पूर्वीच दिवसाळी साजरी झाली. निवडणूक रिंगणातील उमेदवारांच्या भाऊगर्दीने लढती बेरंग झाल्या होत्या. मातब्बरांच्यादृष्टीने त्या डोकेदु:खीच्या ठरल्या खऱ्या; परंतु या लढतीतील उलाढालीने जिल्ह्यातील छोटछोट्या व्यवसायिकांसह व्यापारी व उद्योग क्षेत्र सुखावले.शहरी व ग्रामीण भाग अक्षरश: निवडणूकमय झाला होता. कारण गेल्या पंधदा दिवसांपासून संपूर्ण वातावरण ढवळून निघाले होते. येत्या चार सहा दिवसात तर हे वातावरण शिगेला पोहोचले होते. लढतींचा काय निर्णय लागेल, हा भाग निराळा; परंतु पाचही मतदारसंघात रंगलेल्या या लढती छोटछोट्या व्यवसायिकांसह व्यापारी व उद्योगक्षेत्रास दिलासादायक ठरल्या. महायुती व आघाडी संपुष्टात आली. परिणामी पाचही मतदारसंघात चार प्रमुख पक्ष परस्परांविरोधात बाह्या सरसावून उभे राहिले होते. त्यात अन्य पक्षांनी उमेदवार रिंंगणात उतरवून या लढतीत बहर आणला. त्यामुळे लढती बेरंग झाल्या; मातब्बरांच्या दृष्टीने त्या लढती क्लिस्ट व डोकेदु:खीच्या झाल्या खऱ्या; परंतु छोटछोट्या व्यावसायिकांच्या दृष्टीने या लढती दिवाळी साजरी करण्यासारख्या ठरल्या होत्या.शहरी व ग्रामीण भागातील छोटछोटे हॉटेल्स, पानटपऱ्या, ढाबे, बार कार्यकर्त्यांनी गजबजले होते. सकाळपासून रात्री उशिरापर्यंत चहापाण्यासह नाष्टा व व्हेज-नॉनव्हेजच्या भोजनावळींवर लाखोंचा खर्च सुरु होता. त्या गावा-गावांमधून पदयात्रा, मिरवणुका तसेच सभा, संमेलनाच्या निमित्ताने का असेना दवंडी वाजविणाऱ्यांपासून बॅण्डवाले, तडमताशावाले किंवा डिझे चालकांना सुध्दा सुगीचे दिवस आले होते. गावागावांमधील पेंटर्स, डिजिटल बॅनर्स बनविणाऱ्यांपासून छपाई करणाऱ्या छाप खान्यांवाल्यांचाही व्यवसाय वधारला होता. पाठोपाठ शामीयाने, मंडप, डेकोरेशन, खुर्च्या, टेबल्स, सतरंज्या किंवा अन्य साहित्यवाल्यांचे दिवस फळफळले होते. फुल विक्रेत्यांनाही सुगीचे दिवस आले होते. वाहन बाजार तर उलाढालीने अक्षरश: सुखावला होता.अॅटोरिक्षापासून छोटा हत्ती, व शेकडो जीप गाड्या दररोज प्रचारार्थ धावत होत्या. सभा, संमेलनानिमित्त ट्रॅक्टर्स, टेम्पो, ट्रक्स किंवा मिनीबसेसही कार्यकर्त्यांचे ताफ्याच्या ताफे घेवून धावत होते. वाहन बाजारात गेल्या पंधरा दिवसांपासून एकही वाहन कामाविना उभे नव्हते. डिझेल व पेट्रोलच्या विक्रीतसुध्दा मोठी वाढ झाली असून त्यामुळे पंपचालकही सुखावले.निवडणुकीच्या निमित्ताने किराणा, भुसार बाजारही तेजीत होता. दररोज हजारोंच्या भोजनावळ्या उठत होत्या. त्यामुळे स्वयंपाक्यांसह मजूरांच्या हातास काम मिळाले. भांडीकुंडी, पाणी विक्रीचा व्यवसायही तेजीत आला. साऊंड सर्व्हिसवाल्यांचाही व्यवसाय वधारला. (जिल्हा प्रतिनिधी)
पंधरा दिवसांत झाली शंभर कोटींची उलाढाल
By admin | Updated: October 17, 2014 00:26 IST