औरंगाबाद : वीज जोडणी देण्यासाठी शेतकऱ्याकडून ९ हजार रुपयांची लाच घेताना कनिष्ठ अभियंता आणि लाईनमन यांना आज लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले. ही कारवाई अजिंठा- सिल्लोड रोडवरील हॉटेल राजेंद्र येथे दुपारी ४ वाजता करण्यात आली.कनिष्ठ अभियंता विजय गणेश काथार (३२), रा. म्हसोबानगर, हर्सूल आणि लाईनमन जगन्नाथ शंकर वाणी (४७), रा. चिंचखेडा, ता. सिल्लोड यांना अटक झाली आहे. दोन्ही आरोपी महावितरण कंपनीच्या सिल्लोड ग्रामीण शाखा येथे कार्यरत आहेत. केऱ्हाळा (ता. सिल्लोड) येथील शेतकऱ्याने त्याच्या शेतात वीज जोडणीसाठी मे २०१२ मध्ये महावितरणकडे रीतसर अर्ज केला होता. तुमची जोडणी दोन-तीन महिन्यांत होईल, असे त्यांना मोघम सांगितले जात होते म्हणून शेतकरी विजय काथार यांना भेटल्यावर त्यांनी ९ हजार रुपये मागितले. त्यांना पैसे घेऊन बुधवारी दुपारी हॉटेल राजेंद्र येथे येण्यास सांगितले. शेतकऱ्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे यासंदर्भात तक्रार केली. पोलिसांनी दुपारी सापळा लावला. काथार यांनी लाचेची रक्कम लाईनमन वाणी यांच्याकडे देण्याचे सांगितले. त्यावेळी वाणी यांनी शेतकऱ्यास जोडणीसोबत मीटर बसवावे लागेल यासाठी आणखी हजार रुपये मागितले, अशी एकूण ९ हजार रुपयांची लाच वाणी यांनी घेतली. लाच घेताच दबा धरून बसलेल्या पोलिसांनी त्यांना पकडले. त्यांच्याविरुद्ध सिल्लोड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होत होता. या कारवाईत पोलीस उपअधीक्षक प्रकाश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक रामनाथ चोपडे, किशोर पवार, प्रमोद पाटील, सुधाकर मोहिते, कैलास कामठे, श्रीराम नांदुरे, अजय आवले, नितीन घोडके, शेख मतीन यांचा सहभाग होता.
९ हजारांची लाच घेताना अभियंता, लाईनमन जाळ्यात
By admin | Updated: June 19, 2014 00:53 IST