हिंगोली : शेतकऱ्यांना बांधावरच आधुनिक तंत्रज्ञान मिळावे, या कृषी चिकित्सालयाच्या मूळ उद्देशालाच कृषी विभागाने हारताळ फासला. गतवर्षी लाखो रूपये खर्च करूनही ३०० एकरात २८६ क्विंटलाचे नाममात्र उत्पादन निघाले. आजघडीला चिकित्सालयाच्या जमिनीत सध्याचे तण पाहता यंदाही ‘दिव्याखाली अंधार म्हणण्याची वेळ’ उद्भवण्याची शक्यता नकारता येत नाही. परिणामी, जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या कृषी विभागाचीच ही बोंब असेल तर इतरांनी त्यांचे सल्ले ऐकले तर ‘आमदनी अठन्नी खर्चा रूपया’ ही बोंब होईल.देशाची अर्थव्यवस्था प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या शेतीवर अवलंबून असल्याने कृषी विभागाला अन्यन्य साधारण महत्व प्राप्त झाले. स्थानिक ठिकाणीच उत्पादकांना शेतीबाबत मार्गदर्शन मिळण्यासाठी जिल्हा कृषी विभागात शेतकऱ्यांच्या राबता असतो. याहीपुढे जाऊन शासनाने उत्पादकांना बांधावरच तंत्रज्ञान मिळावे, या उद्धेशाने कृषी चिकित्सालयाची स्थापना केली. जिल्ह्यात त्यानुसार हिंगोली, बासंबा, आखाडा बाळापूर, वसमत आणि गोळेगावात चिकित्सालयाच्या जमिनी आहेत. त्यावर विविध प्रात्यक्षिके करता यावीत, अधिकाऱ्यांना स्व अनुभव घेऊन तो शतेकऱ्यांना सांगता यावा, अधिकाअधिक उत्पादन काढून उत्पादकांना दाखविता यावे, शेतकऱ्यांनाही ते उघड्या डोळ्याने पाहता यावे आणि त्यातून बियाणे तयार करण्यासाठी उत्पादनही घेता यावे, या उद्देशासाठी या जमिनी महत्त्वाच्या आहेत; परंतु यातील एकही उद्देश साध्य होताना दिसत नाही. मागील वर्षी केवळ २८६ क्विंटल उत्पादन ३०० एकरात निघाले. एकाही ठिकाणी समाधानकारकच नव्हे तर सांगण्याजोगाही उतार आलेला नाही. हरभऱ्याचे एकूण उत्पादन ३ क्विंटल झाल्याची नोंद कृषी विभागात सापडते. पैैशांची, तंत्रज्ञानाची आणि वेळेची कमतरता नसतानाही प्रत्येक ठिकाणी तणाने शेत खाल्ले. बहुतांश अधिकाऱ्यांचे परजिल्ह्यातून अपडाऊन असल्याने बाहेरगावच्या ठिकाणची पिके पाहण्यासाठी कदाचित अधिकाऱ्यांना वेळ नसवा; पण जिल्हा कार्यालयाच्या पाठीमागील पीकही त्यांना दिसत नाही, हे विषेश. (वार्ताहर)जिल्हा कृषी अधीक्षक अधिकाऱ्यांनी उपविभागीय कृषी अधिकारी हे काम पाहतात म्हणून त्यांच्याकडे बोट दाखविले. तद्नंतर उपविभागीय कृषी अधिकाऱ्यांनी बाहेरगावी असून गत वर्षी नव्हतो, म्हणून हात वर केले.
आमदनी अठन्नी खर्चा रुपय्या..!
By admin | Updated: September 9, 2014 23:58 IST