औरंगाबाद : दामदुपटीचे आमिष दाखवून वटेश्वर अॅग्रो अँड रिअल इस्टेट प्रा.लि. कंपनीने अनेकांना करोडोचा गंडा घातला असून, चितेगाव येथील शेतकऱ्याने सिडको पोलीस ठाण्यात कंपनीच्या संचालकांविरुद्ध तक्रार दिली आहे. याविषयी माहिती देताना फौजदार हरीश खटावकर म्हणाले की, चितेगाव येथील मंगलसिंग भोपळे यांनी सिडको येथील कार्यालयात ५० हजार रुपये भरले होते. अशाच प्रकारे १११ जणांनीदेखील रक्कम गुंतवली असून, जवळपास ६३ लाख ५४ हजार ५०० रुपयांची फसवणूक झाली आहे. जालन्याच्या मस्तगड परिसरात मुख्य शाखा असून, सिडको एन-७ येथे वटेश्वर अॅग्रो अँड रिअल इस्टेट प्रा.लि. कंपनीने गतवर्षी शाखा उघडली होती. केबीसी, सुपार पॉवरचे प्रकरण गाजत असतानाच जालन्याच्या वटेश्वर अॅग्रो कंपनीने दामदुपटीचे आमिष दाखवून जालना, नांदेड, परभणी, बुलडाणा येथील अनेकांना करोडो रुपयांना गंडविल्याचे उघड झाले आहे. कंपनीचे संचालक भीमराव रामजी वैद्य (रा. अंबड), संजय शिवाजी उफाड, संतोष शिवाजी उफाड (रा. नेर) व कंपनीच्या संचालकांनी तीन वर्षांत दामदुपटीचे आमिष दाखवून शेतकऱ्यांना फसविले आहे.कंपनीने गुंतवणूकदारांना कमिशन देण्यासाठी चेकसारखे दिसणारे व्हाऊचर बनविले होते. यात ३० महिन्यांपर्यंत मिळणाऱ्या रकमेचा उल्लेख केला होतो; परंतु जूनपर्यंत दिलेले व्हॉऊचर वटवून देण्यास कंपनीकडून टाळाटाळ सुरू होती. जालन्याचे संचालक शिवाजी वळसे, संजय उफाड, संतोष उफाड यांनी करोडो रुपयांसह पळ काढल्याचे निदर्शनात आले. या प्रकरणी सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस निरीक्षक राजकुमार डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार खटावकर अधिक तपास करीत आहेत.
दामदुपटीचे आमिष दाखवून करोडोंना गंडा
By admin | Updated: January 23, 2015 00:58 IST