हे माहिती आहे का? आझाद हिंद रेडिओचे प्रमुख सुरेशचंद्र आर्य होते औरंगाबादचे पहिले खासदार

By शांतीलाल गायकवाड | Published: April 19, 2024 01:28 PM2024-04-19T13:28:38+5:302024-04-19T13:29:36+5:30

फ्लॅश बॅक: औरंगाबादचे पहिले खासदार कॉँग्रेसचे सुरेशचंद्र शिवप्रसाद आर्य, पीडीएफचे एस. के. वैशंपायन यांचा दणदणीत पराभव

did you know? Suresh Chandra Arya, head of Azad Hind Radio, was the first MP from Aurangabad | हे माहिती आहे का? आझाद हिंद रेडिओचे प्रमुख सुरेशचंद्र आर्य होते औरंगाबादचे पहिले खासदार

हे माहिती आहे का? आझाद हिंद रेडिओचे प्रमुख सुरेशचंद्र आर्य होते औरंगाबादचे पहिले खासदार

औरंगाबाद : देशातील पहिलीच निवडणूक, पहिलेच मतदान, पहिला खासदार, मतदान म्हणजे काय? ते कसे करतात? आदी अनेक प्रश्न व ९० टक्के निरक्षर समाज. या पार्श्वभूमीवर औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात १९५२ मध्ये निवडणूक झाली. या निवडणुकीत जनमानसावर काँग्रेसचा प्रचंड पगडा होता. याचे प्रत्यंतर मतमोजणीतून दिसले. अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार सुरेशचंद्र शिवप्रसाद आर्य यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार एस. के. वैशंपायन यांचा दणदणीत पराभव केला.

इंग्रज राजवटीच्या दीडशे वर्षांच्या गुलामीतून मुक्त झालेल्या भारतात २५ ऑक्टोबर १९५१ ते २२ फेब्रुवारी १९५२ या काळात पहिल्या लोकसभेसाठी मतदान झाले. देशभरात चार महिने व तब्बल ६८ टप्प्यांत मतदान चालले. औरंगाबादेत जानेवारी १९५२ मध्ये मतदान झाले; परंतु तेव्हा देशाची साक्षरता २० टक्क्यांहून, तर मराठवाड्याची १० टक्क्यांहून कमी होती. त्यामुळे मतदान प्रक्रियेची माहिती नागरिकांनाच काय तर प्रशासनातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनाही नव्हती. हैदराबादच्या निजामावर लष्करी कारवाई करून सप्टेंबर १९४८ मध्ये हे संस्थान भारतात विलीन करण्यात आले. तेव्हा मराठवाडा व कर्नाटकातील काही भूभाग मिळून १९४८ मध्ये हैदराबाद हे स्वतंत्र राज्य तयार करण्यात आले. मराठवाड्यात तेव्हा सहा जिल्हे होते. औरंगाबाद व जालना एकच जिल्हा होता. निरक्षर देशाला मतदानाविषयी माहिती कळावी म्हणून देशभरात ऑक्टोबर १९५१ मध्ये ‘मॉक इलेक्शन’ (निवडणुकीचा सराव) घेण्यात आले होते.

प्रत्येक उमेदवाराची स्वतंत्र मतपेटी
भारताचे पहिले निवडणूक आयुक्त सुकुमार सेन यांच्या नेतृत्वात ही निवडणूक झाली. निवडणुकीत अगदीच नवखा व प्रचंड विस्तारलेल्या देशात लोकसभेचे ४०१ मतदारसंघ व ४८९ जागा होत्या. निरक्षर मतदारांना मतदान करणे सोपे जावे यासाठी प्रत्येक उमेदवाराच्या नावाची स्वतंत्र मतपेटी मतदान केंद्रावर ठेवली होती. या मतपेटीला वेगवेगळा रंग होता. त्यावर उमेदवाराचे नाव व निवडणूक चिन्ह चिकटविण्यात आले होते. जेवढे उमेदवार तेवढ्या मतपेट्या ठेवलेल्या होत्या. मतदार ज्यांना मतदान करायचे त्यांच्या पेटीत ही मतपत्रिका टाकावी लागत होती.

सर्वसाधारण मतदारसंघ, कॉँग्रेसचा दणदणीत विजय
औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून (क्रमांक ११) तेव्हा एकूण किती उमेदवार निवडणुकीत होते, याची अधिकृत माहिती उपलब्ध होऊ शकलेली नाही; परंतु भारतीय निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर निवडणुकीचे निकाल, विजेते व उपविजेत्यांची नावे व त्यांना झालेल्या मतदानाची माहिती आहे. त्यात भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार सुरेशचंद्र शिवप्रसाद आर्य यांना ७१ हजार ९२ मते मिळाली व ते विजयी झाले. त्यांचे प्रतिस्पर्धी पीडीएफचे एस. के. वैशंपायन यांना ३५ हजार ८६९ मते मिळाली. आर्य यांनी वैशंपायन यांचा तब्बल ३५ हजार २२३ मतांनी पराभव केला होता. हा मतदारसंघ सर्वसाधारण गटात आणि एक उमेदवाराचा होता.

पहिल्या खासदाराचा अल्प परिचय
डॉ. सुरेशचंद्र आर्य यांचा जन्म १८ मे १९१२ रोजी झाला. ते हैदराबादेतील हिमायत नगरचे मूळ रहिवासी होते. उच्च विद्याविभूषित असलेले डाॅ. आर्य यांना विद्यालंकार या उपाधीने गौरविले होते. त्यांचे प्राथमिक शिक्षण हरिद्वार येथील गुरूकुलातून झाले. पुढे ते पॅरिस (फ्रान्स) मधून डी.लीट. झाले. जर्मनीतूनही त्यांनी शिक्षण घेतले. सत्याग्रहात सहभागी झाल्याने १९३० मध्ये त्यांना कारागृहात जावे लागले. ते १९३६-३७ या काळात बॉम्बे समाचार पत्रिकेचे संपादक होते. पुढे पदव्युत्तर शिक्षणासाठी विदेशात वास्तव्याला असताना त्यांचा संबंध क्रांतिकारकांशी आला. १९३७ ते ४७ या काळात ते आझाद हिंद सेनेच्या आझाद हिंद रेडिओचे प्रमुख होते. बर्लिनमध्ये राहून ते हे काम पाहत होते. व्हिएन्नात १९५४ मध्ये इंटर पार्लमेंटरी कॉन्फरन्समध्ये त्यांचा सहभाग होता.

असे होते मतदारसंघ
पहिल्या लोकसभेसाठी देशभरात लोकसभेचे ४०१ मतदारसंघ होते. तर ४८९ जागा होत्या. ३१४ मतदारसंघ एक सदस्यीय तर ८६ मतदारसंघ दोन सदस्यीय होते. त्यात सदस्य सर्वसाधारण तर दुसरा सदस्य राखीव प्रवर्गातील एससी अथवा एसटी प्रवर्गातील होता.

काँग्रेसचा ३६४ जागांवर विजय
देशभरात १८४९ उमेदवार उभे होते. ३६ कोटी लोकसंख्येच्या देशातील २१ वर्षे पूर्ण करणारे १७ कोटी ३० लाख मतदार होते. ४५.७ टक्के मतदान घेऊन काँग्रेसने ३६४ जागांवर विजय मिळवला होता. तेव्हा फक्त दोन पक्षाने विजयी उमेदवारांचा डबल आकडा गाठला होता. त्यात सीपीआयचे १६ व सोशॅलिस्ट पार्टीचे १२ खासदार विजयी झाले होते. भारतीय जनसंघाचे तीन खासदार निवडून आले. १७ एप्रिल १९५२ रोजी पहिली लोकसभा अस्तित्वात येऊन पंडित जवाहरलाल नेहरू पहिले पंतप्रधान झाले.

Web Title: did you know? Suresh Chandra Arya, head of Azad Hind Radio, was the first MP from Aurangabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.