राजेश खराडे , बीड‘टाईमपास’ या मराठी चित्रपटात अभिनेता प्रथमेश परब व अभिनेत्री केतकी माटेगावकर यांचा ‘चला.. हवा येऊ द्या...’ हा डायलॉग प्रसिद्ध आहे. उन्हाळ्याचे दिवस असल्याने सध्या हवा सर्वांनाच हवीहवीशी आहे. मात्र, विजेवर चालणारी उपकरणे वापरताना बचतीचा मंत्र जपणे गरजेचे आहे. शासकीय कार्यालयांनी व स्वत: महावितरणने तर वीजबचतीचे भान राखलेच पाहिजे;परंतु आवश्यकता नसताना दिवसभर विविध शासकीय कार्यालयांमधील पंखे, कूलर सुरुच असतात. यामुळे वीज तर वाया जातेच; पण बिलाचा भूर्दंडही सहन करावा लागतो. ‘चला हवा येऊ द्या’च्या नादात विजेचा कसा अपव्यय होतो ? हे ‘लोकमत’ने सोमवारी स्टींगमधून समोर आणले.बिले भरण्यात उदासन असलेली प्रशासकिय कार्यालये विजेचा अपव्यय करण्यात आग्रस्थानी आहेत. शहरातील पथदिवेही दिवसभर सुरू राहत असल्याने पथदिव्यांच्या बिलाचा भार सर्वसामान्य नागरिकांना सहन करावा लागत आहे. विजेचा काटेकोरपणे वापरण्यासंदर्भात कोणतेही गांभीर्यपाळले जात नाही. प्रशासकिय कार्यालयांतील विविध कक्षांमध्ये अधिकारी, कर्मचारी नसतानाही राजेरोसपणे विद्युत उपकरणे चालू ठेवली जात आहेत. बीड विभागाकडे अधिकची थकबाकी असल्याने भारनियमनात वाढ झालेली आहे. थकबाकीनुसार ए.बी.सी.डी.ई.एफ च्या वर्गात भारनियमन केले जात आहे. बीड शहरात १६ फिडर असून त्यापैकी ८ फिडरवर भारनियमन आहे. तर आठ भारनियमनमुक्त . तर ग्रामीण भागात सिंगल फेज असलेल्या ठिकाणी ६ तासाचे तर इतर ठिकाणी आठ तासाचे भारनियमन होत आहे. पब्लिक रिलेशनमुळे प्रशासकिय कार्यालये व पथदिव्यांचे भारनियमन कमी झालेले आहे. मात्र या विभागाकडूनच विजेचा अपव्यय होत असल्याचे दिसत आहे. सातत्याने विजेचे महत्व सांगणाऱ्या विभागीय कार्यालयामधील प्रत्येक विभागात विजेचा अपव्यय होत असल्याचे निदर्शनास आले. जालना रोडवरील विभागीय कार्यालयातील तांत्रिक विभागातील भरदुपारच्या वेळीही दिव्यांचा झगमगाट होता. तर पंखे केवळ रिकाम्या खुर्चीना वारा घालत असल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे कक्षांमध्ये अधिकारी नसतानाही दिवे व पंखे सुरूच होते. एकीकडे ग्राहकांना भारनियमनाचा फटका बसत आहे तर दुसरीकडे प्रशासकिय कार्यालये भारनियमनमुक्त करण्यात आलेले असतानाच त्याचाच गैरफायदा उचलत विद्युत उपकरणे बंद करण्याकडे दुर्लक्ष होत आहे.
चला.. हवा येऊ द्या !
By admin | Updated: May 19, 2015 00:50 IST