जालना : जिल्ह्यात अल्पसा पाऊस व गारपिटीमुळे कापूस, सोयाबीन आणि मका या पिकांचे अपेक्षित सरासरीच्या तुलनेत १५६० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने केंद्रीय पथकाकडे सादर करण्यात आली.सोमवारी बदनापूर व जालना तालुक्यातील एकूण सहा ठिकाणी भेट देऊन केंद्रीय पथकाने दुष्काळी परिस्थितीची पाहणी केली. केंद्रीय सचिव आर.पी. सिंग यांच्या नेतृत्वाखालील या पथकात चार जणांचा सहभाग होता. या पथकाने सकाळी सोमठाणा येथील कोरड्या पडलेल्या अप्पर दुधना प्रकल्पासह बदनापूर, गेवराई (बाजार), गोकुळवाडी, गोंदेगाव, वाघ्रुळ जहांगीर या ठिकाणी काही शेतकऱ्यांच्या शेतपिकांची पाहणी केली. जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक यांनी केंद्रीय पथकाकडे दिलेल्या माहितीनुसार, एकूण ४ लाख ६१ हजार १५३ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. कपाशीचे २ लाख ९४ हजार हेक्टर, सोयाबीन १ लाख ९ हजार २५६ हेक्टर तर मक्याचे पीक ५७ हजार ६५४ हेक्टर क्षेत्रात बाधित झाले आहे. जिल्ह्यात यंदा एकूण सरासरीच्या ५४ टक्केच पाऊस झाल्याने ७ पैकी १ मध्यम तर ५७ पैकी ८ लघुप्रकल्प कोरडे पडले आहेत. अनेक विहिरीही कोरड्या पडल्या असून काहींनी तळ गाठला आहे. त्यामुळे पिकांनाही पुरेसे पाणी मिळाले नाही.कपाशीचे पीक वाळून गेले आहे. सोयाबीनची लागवड खुंटली. तर सध्या रब्बी पिकांनाही मोठ्या प्रमाणावर फटका असला आहे. ४बदनापूर : तालुक्यातील सोमठाणा, गोकुळवाडी व बाजार गेवराई शिवारातील शेतकऱ्यांनी सोमवारी दुष्काळाच्या पाहणीसाठी आलेल्या केंद्रीय पथकातील सदस्यांसमोर आपल्या व्यथा मांडल्या. पथकातील सदस्यांनी विविध बाबींची माहिती येथील शेतकऱ्यांकडून जाणून घेतली. सोमठाणा येथील अप्पर दुधना या या धरणावर पाहणी करण्याकरीता येणाऱ्या पथकासाठी अधिकाऱ्यांनी मिनरल वॉटरच्या बॉटल व बिस्कीट पुडे ठेवलेले होते. मात्र या पथकाने तिकडे जाणे टाळले. यावेळी दुधनवाडीचे सरपंच पद्माकर पडूळ, जि.प.सदस्य बाळासाहेब वाकुळणीकर, गणेश कोलते, रामपाल तापडीया, भडांगे आदींसह अनेकांनी या पथकासमोर व्यथा मांडल्या.गेल्या दोन वर्षापूर्वी या जिल्ह्यात भीषण दुष्काळी परिस्थिती उद्भवली होती. विशेषत: राज्यात अन्य जिल्ह्याच्या तुलनेत या जिल्ह्यातील दुष्काळी स्थिती भयावह होती. आवर्षणामुळे खरीपापाठोपाठ रबी पिके पूर्णत: कोलमडली. त्यातून शेतकरी उद्धवस्त झाला होता. या गोष्टीची जिल्हाधिकारी नायक यांनी केंद्रीय पथकास नोंद घ्यायला लावली. त्या दुष्काळातून जिल्हा सावरत असताना गेल्या वर्षी गारपीटीच्या तडाख्याने पुन्हा शेतीसह शेतकऱ्यांना तडाखा बसल्याचे निदर्शनास आणून दिले. दोन वर्षातील या आपत्तीने शेतकरी खचला आहे. ग्रामीण अर्थव्यवस्थेवर त्याचे विपरित परिणाम झाले असल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी आवर्जुन निदर्शनास आणून दिले. या जिल्ह्यात कायमस्वरूपी उपाय अवलंबिण्यासंदर्भात दुरोगामी अशी धोरणे आखणे गरजेचे आहे, असे मतही व्यक्त केले. समितीच्या सदस्यांनी त्यांचे हे म्हणणे गांभिर्याने ऐकून घेतले.
दीड हजार कोटींच्या नुकसानीचा दावा
By admin | Updated: December 16, 2014 01:04 IST